शिवसेना ठाकरे गटाने भारत-पाक सामन्यावरून भाजपवर निशाणा साधला असून रविवारी आंदोलन जाहीर केले आहे. पहलगाममधील 26 भगिनींचे कुंकू पुसलं गेलं, त्यानंतर ऑपरेशन सिंदूर मोहीम केली. ही कारवाई अजूनही सुरू असताना पाकिस्तानसोबत सामना कसा काय? असा सवाल ठाकरे गटाने केला आहे. तर, दुसरीकडे ठाकरे गटाच्या आंदोलनावर भाजप आणि शिंदे गटाने टीका केली आहे.
advertisement
मुंबई, पुण्यासह ठिकठिकाणी आंदोलन...
मुंबईतील बोरिवली रेल्वे स्टेशनबाहेर ठाकरे गटाने आंदोलन केले. दहशतवादी हल्ल्यात माता भगिनींचे कुंकू पुसलेले असतानाही या गोष्टीचा विसर पडून पाकिस्तान सोबत क्रिकेटचा डाव मांडण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाला शिवसेनेकडून कडाडून विरोध दर्शविण्यासाठी शिवसेना महिला आघाडीच्यावतीने "माझं कुंकू माझा देश" हे राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलं. मुंबईतील करी रोड, सायन-प्रतिक्षानगरमध्येही ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले. खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, माजी महापौर किशोरी पेडणेकर आदींसह अनेक शिवसैनिकांनी सहभाग घेतला.
ठाण्यातील चंदनवाडी येथील शिवसेना शाखेसमोर आज शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक आंदोलन करत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना (ठाकरे गट) नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. महिलांनी या आंदोलनात विशेष सहभाग घेत, संताप व्यक्त करत क्रिकेटचे साहित्य फोडून निषेध नोंदवला. मुस्लिम महिलांसह शेकडो महिलांनी मोदींना सिंदूर पाठवून आपला निषेध व्यक्त केला आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा बळी गेला. यामध्ये डोंबिवलीतील तिघांचा समावेश असल्याने संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि मनसे एकत्र रस्त्यावर उतरून पाकिस्तानविरोधात आणि मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनादरम्यान नेत्यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली.
पुण्यातील लाल महाल चौकातही आंदोलन करण्यात आले. यावेळी स्थानिक पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने हजर होते. यावेळी भाजप प्रणित केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
ऑपरेशन सिंदूर आणि भारत पाकिस्तान मॅचच्या विरोधात आज पंढरपुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणांनी शिवसैनिकांनी पंढरपूर दणाणून सोडले.