जालना : विड्याची पाने ही भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय महत्त्वाची मानली जातात. प्रत्येक शुभकार्यांमध्ये पानाचा वापर केला जातो. त्याच पद्धतीने सुखदुःखाच्या प्रत्येक प्रसंगी पान खाल्ले जाते. विड्याच्या पानाला नागवेलीचे पान असेदेखील म्हटले जाते. या पानाची शेती जालना जिल्ह्यात केवळ तीन गावांमध्ये केली जाते. यापैकीच एक म्हणजे जाफराबाद तालुक्यातील भारत बुद्रुक हे गाव. या गावातील बारी समाज मुख्यत्वे पानमळ्याची शेती करतो.
advertisement
बारी समाजातील नागरिकांचा हा पारंपारिक आणि पिढीजात व्यवसाय आहे. त्यामुळे या व्यवसायातील बारकावेदेखील त्यांना माहित आहे. त्यामुळे मग ही शेती नेमकी कशी केली जाते, याबाबत लोकल18 चा हा स्पेशल रिपोर्ट.
पान मळ्याची शेती करत असताना सर्वात आधी पाऊस शेवगा तसेच शेवरी या वृक्षांची लागवड केली जाते. त्यानंतर दीड ते दोन महिन्यांनी जुन्या पान मळ्यात पानाच्या वेलीचे तुकडे करून तेच लावले जाते. सुरुवातीची आठ ते दहा दिवस ठिबक सिंचनाद्वारे या वेलींना दररोज पाणी दिले जाते. अडीच बाय अडीच किंवा तीन बाय तीन या अंतरावर या वेलांची लागवड केली जाते.
Sanket Gawhale : विदर्भाचा लाल पुन्हा जाणार रशियात, महिन्याभरात दुसऱ्यांदा आलं निमंत्रण
दहा ते बारा दिवसांनी या वेलींना धुमारे फूटतात. यानंतर दोन ते तीन दिवसांच्या अंतराने वेलींना पाणी दिले जाते. चांगला वाढू लागला की त्याला शेवरी आणि शेवग्याच्या झाडावर चढवले जाते. त्याची बांधणी करण्यासाठी लव्हाळाच्या काड्यांचा वापर केला जातो. वेलींना सुरुवातीला फुटलेल्या पालवीला नव्हतीचे पाने असे म्हटले जाते. पान मळ्यातील वेली उंचच उंच झाल्यानंतर त्यांना शेवगा आणि शेवडीच्या वृक्षांवरती चढवले जाते. पानांनी योग्य आकार घेतल्यानंतर त्यांची तोडणी केली जाते. पान मळ्यामध्ये पान बिलींची लागवड करण्यात आली. त्यामध्ये शेणखत घातलं जातं. थोड्याफार प्रमाणात कीटकनाशकांचाही वापर करण्यात येतो.
चिखली सिल्लोड भुसावळ खामगाव अशा मार्केटमध्ये या पानांची विक्री केली जाते. अडीच हजार पानांच्या एका पेटार्याला एक ते दीड हजारांचा दर मिळतो वर्षभरात पाणमळ्याच्या शेतीमधून एका एकरात चार ते पाच लाख उत्पन्न होतं. या व्यवसायात कुशल मजुरांची आवश्यकता असल्याने मजुरीसाठी जवळपास एक ते दीड लाख रुपयांचा खर्च येतो. त्यामुळे वर्षाकाठी अडीच ते तीन लाख रुपये उत्पन्न मिळते, असे मंगेश बेराड यांनी सांगितले.
दरम्यान, पानमळ्याच्या शेतीमधून चांगले उत्पन्न या शेतकऱ्यांना होत असले तरी या शेतीला शासनाकडून विमा संरक्षण नाही. त्याचबरोबर कुशल मनुष्यबळाचा देखील अभाव आहे. जमिनीतील खालावत चाललेली पाणी पातळी यामुळे हा व्यवसाय करणे कठीण होत आहे. यामुळेच पानमळ्यांची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याचेही मंगेश बेराड यांनी सांगितले.





