मुंबई: निवडणूक मतदार यादीतील त्रुटींसह इतर काही प्रक्रियांवर आक्षेप घेत महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांच्या भेटीसाठी पुन्हा दाखल झाले. मंगळवारी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर आज निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्यासोबत मंत्रालयात बैठक सुरू झाली आहे. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळ आजही आक्रमक झाले असून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी राज्य निवडणूक आयुक्तांना प्रश्न करताना राहुल गांधी पॅटर्न वापरला. जयंत पाटील यांनी गंभीर सवाल केले.
advertisement
मंत्रालयात मंगळवारी झालेल्या बैठकीत मतदार यादींचा घोळ ते व्हीव्हीपॅटच्या मुद्यावर ठाकरे बंधूंनी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांना धारेवर धरलं होतं. त्यानंतर आज पुन्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले. राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्यावरही ठाकरे बंधूंसह महाविकास आघाडीचे नेत्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली.
जयंत पाटील यांचा राहुल गांधी पॅटर्न....
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप व्यक्त करताना कथित बोगस मतदारांचा दाखला दिला. राज्य निवडणूक आयुक्तांच्या बैठकीत बोलताना जयंत पाटील यांनी म्हटले की, अंतेश्वर गंगाराम शिंदे हा उदगीरमधील मतदार आहे. मात्र, त्याचा कोणता ठावठिकाणा नाही ही बाब जयंत पाटील यांनी लक्षात आणून दिली. EPIC क्रमांक वेगवेगळा असायला पाहिजे. बरेच मतदार असे की ज्यांना एकच EPIC क्रमांक असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले. आम्ही अर्ज केला, जाब विचारलं तर आयोग उत्तर देत नाही. जयंत पाटील यांनी थेट पुरावेच निवडणूक आयुक्तांसमोर सादर केले.
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर सकाळी नाव, संध्याकाळी डिलिट...
कामठी विधानसभा मतदारसंघात घर क्रमांक शून्य असलेले 400 मतदार असल्याचे जयंत पाटलांनी सांगितले. नालासोपारा येथील नाव सुषमा यादव ही खोटी मतदार असल्याचे दिसून आले. आम्ही तिथे गेलो शहानिशा केली. लगेच संध्याकाळी हे नाव काढले असल्याचे जयंत पाटलांनी सांगितले. तुमची वेबसाईट कोण तरी वेगळं माणूस हँडल करत आहे. सकाळी मतदाराचे नाव असते आणि बातम्यांमध्ये ते नाव आले तर ते संध्याकाळी डिलीट कसं होतं असा सवाल त्यांनी केला.
आम्ही विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान ज्या त्रुटी सांगितल्या होत्या त्यावर काम झाले नसल्याची तक्रार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत. त्याबाबतही अनेक तक्रारी असल्याचे त्यांनी म्हटले.