ऐन गणेशोत्सव काळात पुणे शहरात नात्यांमध्येच रक्तरंजित थरार पाहायला मिळाला. आंदेकर-कोमकर टोळी युद्धातून गुन्हेगारी जगताशी कसलाही संबंध नसणाऱ्या महाविद्यालयीन तरुण आयुषची हत्या करण्यात आली. आयुषची आई कल्याणी कोमकरने पोलीस तक्रारीत बंडू आंदेकर आणि त्यांच्या टोळीविरोधात तक्रार दिली आहे. बंडू आंदेकर, वृंदावनी वाडेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, अमन पठाण, सुजल मेरगु या ६ आरोपींची नावे आयुषच्या हत्या प्रकरणात आहेत. 'सकाळ'ला दिलेल्या मुलाखतीत आयुषच्या आईने मुलगा गेल्याची वेदना आणि होत असलेल्या आरोपांवर भाष्य केले.
advertisement
वनराजच्या बॉडीवर हात ठेवून माझ्या नवऱ्याने सांगितलं होतं की....
माझा भाऊ वनराज आंदेकरचा मागील वर्षी खून झाला. आमचा आंदेकरांशी संपत्तीवरून वाद असल्याचे सांगत आम्हीच हा खून केल्याचा आरोप आमच्यावर केला गेला. परंतु आम्ही हा खून केलेला नाही, हे कित्येक वेळा सांगितले आहे. अगदी माझा नवरा गणेश कोमकर यांनी माझा भाऊ वनराज आंदेकर याच्य मृतदेहावर हात ठेवून सांगितले होते की माझा या खुनाशी कसलाही संबंध नाही. आम्ही हे कृत्य केलेले नाही. परंतु तरीही आमच्यावरच खून प्रकरणाचे आरोप होतात. गेले वर्षभर माझा नवरा तुरुंगात आहे. न केलेल्या गुन्ह्याची ते शिक्षा भोगत आहेत. दुसरीकडे कसलाही संबंध नसताना, कुणाच्या अध्यात मध्यात नसताना माझ्या पोराचही खून झाला. पोरगा जाण्याची वेदना खूप भयंकर आहे, असे रडत रडत कल्याणी कोमकर म्हणाल्या.
आम्ही गरीब आहोत, आमच्या कुटुंबाच्या मागे पाठीराखे कुणी नाहीत, म्हणून आमच्यावर अन्याय केला जातोय. आमच्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि न्याय मागण्यासाठी आम्ही पुणे पोलीस आयुक्तालयात गेलो मात्र पोलीस आयुक्त सुट्टीवर आहेत, असे आम्हाला सांगण्यात आले. मायबाप सरकारने आम्हाला न्याय द्यावा. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, रुपाली ठोंबरे यांनी या प्रकरणात लक्ष घालून आमच्यावरील अन्यायाला वाचा फोडावी.
आम्ही गणपतीचा प्रसाद बनवत होतो तेवढ्यात....
आयुषच्या मावस बहिणीने हत्येवेळचा थरारक प्रसंग कथन केला. आयुष हा त्याच्या लहान भावाला दररोज क्लाससाठी सोडायला आणि न्यायला जायचा. घटनेदिवशीही संध्याकाळी सव्वा सात-साडे सातच्या सुमारास आयुष हा अर्णवला क्लासवरून घ्यायला गेला होता. तो आमच्या इमारतीच्या खाली पार्किंगमध्ये आला. त्यावेळी त्याला काही जणांनी मारायला सुरुवात केली. त्याच्यावर गोळ्या झाडल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. मी आणि माझी मावशी प्रसाद बनवत होतो. तेवढ्यात काही लोकांनी आम्हाला येऊन घटनेबद्दल सांगितले. आम्ही हातातली कामे टाकून तत्काळ खाली गेलो. आयुषची अवस्था पाहून आम्ही त्याला उचलून हॉस्पिटललमध्ये न्यायचा प्रयत्न केला. पण त्याचे शरीर थंड पडले होते. त्याचे सगळे शरीर जड झाले होते, तो आम्हाला उचलत नव्हता. आम्ही पोलिसांना फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली. मात्र गणेशोत्सव असल्याने प्रचंड वाहतूक कोंडीमुळे पोलिसांना यायला साधारण अर्धा तास लागला, अशी आपबिती आयुषच्या मावस बहिणीने सांगितली.