आपण आपली दिवाळी कायम घरातच साजरी करत असतो, पण ज्या शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून संपूर्ण महाराष्ट्र उजळून टाकला. त्याच महाराजांनी घडवलेले अनेक किल्ले दीपावलीच्या काळात अंधारातच असतात. म्हणूनच दिवाळीचा पहिला दिवा हा शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पन्हाळगडावर लागावा, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. त्यानुसार कोल्हापूर हायकर्स तर्फे गेल्या 11 वर्षांपासून पन्हाळा गडावर धनत्रयोदशीच्या दिवशी दीपोत्सव साजरा केला जातो, असे कोल्हापूर हायकर्स फाउंडेशनचे अध्यक्ष सागर पाटील यांनी सांगितले आहे.
advertisement
दिवाळी सगळ्यांची गोड, 1200 कुटुंबांना तब्बल 3600 किलो फराळ वाटप Video
2012 पासून सुरू झालेला हा दीपोत्सवाचा उपक्रम आजतागायत अत्यंत उत्साहात आणि हजारो शिवभक्तांच्या साक्षीने दरवर्षी साजरा केला जातो. यावेळी विविध ऐतिहासिक व्याख्याने आयोजित केलेली असतात, तर शिवकालीन मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके शिवभक्तांना पाहायला मिळतात. त्याचवेळी पन्हाळगडावर हजारो दिवे लावले जातात.
अंगणात लक्ष वेधून घेईन नक्षीदार मोर, दिवाळीला काढा आकर्षक रांगोळी, Video
यंदा पन्हाळगडावर ताराराणी महाराजांच्या राजवाड्यावर, शिव मंदिर आणि परिसरात, दीपोत्सव साजरा करण्यात आला. त्यासोबतच मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, शाहिरीचा कार्यक्रम, इतिहासकार इंद्रजित सावंत यांच्याकडून महाराणी ताराराणी यांच्या संपूर्ण इतिहासाबद्दलचे व्याख्यान असे कार्यक्रम पार पडले. त्यामुळे पुढच्या पिढीपर्यंत इतिहास जपला जावा, हा या उपक्रमाच्या मागचा उद्देश पुन्हा एकदा सार्थ ठरल्याची भावना सागर पाटील यांनी व्यक्त केली.
दरम्यान, हजारो दिव्यांमुळे किल्ले पन्हाळगड हा अंधारातही उजळून निघाला होता. तर दिव्यांसोबत आपला फोटो काढण्याचा मोह बऱ्याच जणांना आवरता आला नाही.