हद्दपारीची शिक्षा पूर्ण करून शहरात येताच झाला हल्ला
महेश राख हा नुकताच हद्दपारीची शिक्षा पूर्ण करून कोल्हापुरात परतला होता. तो शहरात परतल्यानंतर काही तासांतच गंगाई लॉनजवळ सात ते आठ जणांच्या टोळक्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला. हल्लेखोरांनी तलवार, एडका, फायटर आणि लोखंडी गजाचा वापर करत महेशवर हल्ला चढवला. या हल्ल्यात महेशचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र विश्वजीत फाले गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपींनी महेशच्या मित्राच्या घरावरही बिअर बाटल्या आणि दगडफेक करून नुकसान केले. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
पत्नीच्या वादातून जीवघेणा संघर्ष
करवीर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार, या खुनामागे वैयक्तिक सूड असल्याचे समोर आले आहे. संशयित आरोपी आदित्य गवळी आणि महेश राख यांच्यात गवळीच्या पत्नीवरून वाद होता. महेशने तिला घरी आणून तिच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. याच कारणावरून दोघांमध्ये अनेक वेळा वाद झाले होते. याच वैमनस्यातून आदित्य गवळी आणि त्याच्या साथीदारांनी मिळून मध्यरात्री हा हल्ला केल्याचा पोलिसांचा संशय आहे.
सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये आदित्य गवळी, हर्षद गवळी, हर्षवर्धन शर्मा, शुभम साळोके उर्फ समर, पियुष कांबळे, पियुष पाटील आणि यशम कुटे यांचा समावेश आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास वेगात सुरू आहे. या घटनेमुळे शहराच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.