कोल्हापूर : देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे पूर्ण झाली आहेत. एकीकडे कित्येक गोष्टींमध्ये देश आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव गाजवत आहे. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील काही दुर्गम भागात अजूनही नागरीक मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित आहेत. अशाच प्रकारे आजवर दळणवळणाचे कोणतेही साधन उपलब्ध नसणाऱ्या कोल्हापूरच्या एका गावात स्वातंत्र्यानंतर पहील्यांदाच लालपरीचे आगमन झाले आहे. गावातील लहानांपासून ते वृध्दांपर्यंत सर्वांनी यासाठी आनंद व्यक्त केला आहे.
advertisement
कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्याच्या पश्चिमेस कोते ग्रामपंचायती अंतर्गत मानेवाडी हे गाव आहे. जेमतेम हजारभर लोकवस्तीचे हे गाव आजही मूलभूत सुविधांपासून किंचित दूरच आहे. आरोग्य, शिक्षण, पिण्याचे पाणी अशा समस्यांचा सामना या गावचे गावकरी आजवर करतच आले आहेत. मात्र आजूबाजूच्या ठिकाणी जायचं म्हटलं तरी पायपीट करतच गावातून बाहेर पडावे लागत होते. पूर्वीपासूनच गावातील दळणवळणाच्या समस्येमुळे या गावातील हातावर मोजण्या इतक्याच मुली बाहेरच्या ठिकाणी जाऊन उच्च शिक्षण घेतलेल्या आढळतात. या सगळ्या परिस्थितीत गावात एसटी येणे ही गोष्ट सर्वांसाठीच आनंदाची बाब आहे.
गावात एसटीची सोय मिळावी यासाठी बरेच ग्रामस्थ अनेक वर्ष धडपड करत होते. याआधी गावाच्या सीमेबाहेर गावापासून जवळपास एक ते दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या फाट्यावरून दुसऱ्या गावातून जाणारी एसटी मिळायची मात्र विद्यार्थ्यांना महिलांसह जवळपास सर्वांनाच तिथवर पायपीट करावी लागत असायची. गावकऱ्यांना एसटी पकडण्यासाठी तिथवर जावे लागायचे. त्यामुळे त्यांची गैरसोय होत होती. मात्र आता गावातच लालपरी आल्यानंतर गावकऱ्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही, असे ग्रामस्थ प्रकाश माने यांनी सांगितले आहे.
एका पॉझिटिव्ह महिलेची गोष्ट, स्वत: बाधित असूनही बनल्या HIV ग्रस्तांच्या आधारवड, Video
गावातील महिलांनी गावाच्या वेशीवरच पहिल्या एसटी बसचे औक्षण केले होते. तर ढोल ताशांच्या गजरात एसटीच्या चालक आणि वाहकांचा खास सत्कार करण्यात आला. गावात उच्च शिक्षणाची संधी नसल्यामुळे बाहेर जावे लागत होते. रोज कॉलेजला जाताना पायपीट करावी लागत होती. मात्र आता गावात एसटी आल्यामुळे तो त्रास कमी होईल याचे समाधान वाटते, असे मतही गावातील एका विद्यार्थिनीने व्यक्त केले आहे.