कोल्हापूर, 27 डिसेंबर : कोल्हापूर हा एक सुजलाम सुफलाम जिल्हा आहे. मात्र तरी देखील वाढत्या शहरीकरणामुळे कोल्हापुरातील काही भागात वृक्षसंख्या बरीच घटलेली पाहायला मिळते. माळरानावर पशुपक्ष्यांना पाण्याच्या शोधात फिरावे लागते. उन्हाळ्याच्या दिवसात या मुक्या जीवांचे पाण्याविना हाल होत असतात. त्यामुळेच काही संस्था यासाठी पुढे येत असतात. अशीच एक सामाजिक संस्था कोल्हापुरात पुढे येऊन काम करत आहे. येणाऱ्या उन्हाळ्यात पशुपक्ष्यांना पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी आत्ताच कृत्रिम पाणवठे या संस्थेकडून तयार करण्यात आले आहेत.
advertisement
खरंतर पर्यावरणाची व्याख्या ही खूप मोठी आहे. वृक्षसंपदेसोबतच इतर पशूपक्षी, कीटक आदी सर्वांचा यामध्ये समावेश होतो. वृक्षप्रेमी वेल्फेअर फाउंडेशन कोल्हापूर जिल्ह्यात वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनाचे कार्य करते. याच संस्थेच्या माध्यमातून कोल्हापुरातील माळरानावर काही ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत.
शिवाजी विद्यापीठानं शोधला घनकचऱ्यावर उपाय, या प्रकल्पातून होतोय दुहेरी फायदा, Video
कृत्रिम पाणवठ्यांची का आहे गरज..?
शहराची प्रगती होईल तशी नागरिक वस्ती वाढत गेली आहे. त्याचबरोबर व्यवसायांचाही विस्तार वाढला आहे. त्या कारणाने नैसर्गिक जलस्त्रोतांवर बऱ्याच ठिकाणी अतिक्रमणे करण्यात आलेली आहेत. नैसर्गिक जलस्त्रोत घटल्यामुळे पर्यावरणातील एक महत्त्वाचा घटक असलेल्या पक्षांवर याचा परिणाम झाला. अशा परस्थितीमध्ये कित्येक पक्षी नामशेष देखील होत आहेत. कित्येक नद्या, नाले, तलाव मुजवण्यात आल्यामुळे पक्षांसमोर जगण्याचा प्रश्न उपस्थित झालेला आहे.
खरंतर पक्षी हे नैसर्गिकरित्या वृक्षसंपदा वाढवण्याचे काम करतात. त्यामुळे जर पर्यावरण रक्षण करायचे असेल, तर पक्षांच्या या समस्याकडे लक्ष देणे गरजेचे होते. म्हणूनच पक्षांची आणि प्राण्यांची देखील कृत्रिमरीत्या पाण्याची गरज पूर्ण व्हावी. यासाठी वृक्षप्रेमी संस्थेच्या माध्यमातून कोल्हापूर शहरातील काही टेकड्यांवर कृत्रिम पाणवठे बनवून पाहण्यात आले होते. या पाणवठ्यातील पाण्याचा पक्षांना पिण्यासाठी, पाण्यात मनसोक्त खेळण्यासाठी फायदा होऊ लागला. त्यासाठी अजून असे पानवठे बनवण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून करत आहोत, असे वृक्षप्रेमी वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल बुड्ढे यांनी सांगितले आहे.
बाबा सोडून गेले, आईनं मोठं केलं आज लेकीने राष्ट्रपती सुवर्णपदक मिळवलं, साईसिमरनची गोष्ट
पाण्याचे बाष्पीभवन टाळण्यासाठी उपाय
सध्या बदलत्या हवामानामुळे उन्हाचा तडाखाही वाढत चालला आहे. त्यामुळे त्या कृत्रिम पाणवठ्यातील पाणी बाष्पीभवनाने लवकर कमी होऊ नये, यासाठी देखील या संस्थेने उपाय केले आहेत. खालच्या बाजूला पांढरे जाड प्लास्टिक अंथरून त्यावर बऱ्याच ठिकाणी हे पाणवठे बनवलेले आहेत. पांढरा रंग हा कमी उष्णता शोषून घेत असल्यामुळे पाणी जास्त दिवस या पाणवठ्यात राहील. तर वेळोवेळी या पाणवठ्यांमध्ये संस्थेच्या माध्यमातून पाणी देखील ओतले जाईल, असेही अमोल यांनी सांगितले.
मुलांनाही करुन घेतले सहभागी..
सध्या निसर्गाच्या सानिध्यात राहून लहान मुलांनी पर्यावरणाशी आपलं नातं घट्ट करण्याची गरज आहे. मातीत खेळणे, बागडणे त्याचबरोबर पशुपक्ष्यांसाठी कृत्रिम पाणवठे तयार करणे, या गोष्टी लहान मुलांकडून घडाव्यात, म्हणून पाणवठे निर्मितीच्या कामात सर्व वयोगटाच्या सदस्यांसोबतच लहान मुलांनाही सहभागी करून घेण्यात आले होते, असे वृक्षप्रेमी वेल्फेअर फाउंडेशनचे महादेव मोरे यांनी सांगितले.
या ठिकाणी होईल पशुपक्षांच्या पाण्याची सोय..
वृक्षप्रेमी संस्थेच्या माध्यमातून ‘पक्षीतीर्थ’ उपक्रमातून बनवण्यात आलेल्या या कृत्रिम पाणवठ्यांमुळे येत्या उन्हाळ्यात पशु-पक्ष्यांची काही प्रमाणात पाण्याची सोय पूर्ण होईल. उन्हाळ्यात कडक ऊन असणाऱ्या टेंबलाईवाडी टेकडी, राजाराम कॉलेज टेकडी, शासकीय तंत्रनिकेतन परिसर, पुईखडी, खडीचा गणपती आदी ठिकाणी हे कृत्रिम पाणवठे पशुपक्ष्यांची तहान भागवतील.
दरम्यान, कधी काळी कोल्हापूर हे एक तळ्यांचे शहर म्हणून ओळखले जायचे. मात्र त्याच कोल्हापुरात सध्या पशुपक्षांना देखील पाण्यासाठी भटकंती करावी लागणे ही खरंच एक दुर्दैवी गोष्ट आहे. असे असले तरी वृक्षप्रेमी संस्थेच्या या अनोख्या उपक्रमातून नक्कीच पशुपक्ष्यांना पिण्याच्या पाण्याबाबतीत काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.