या सर्व घटनाक्रमानंतर अनमोल कवटे यांचा कारचालक नवनाथ धाकपाडे यांनी पोलिसांकडे जबाब नोंदवला आहे. पोलिसांना दिलेल्या जबानीत त्यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. शिवाय घटनेपूर्वी आम्ही थोडी सावधगिरी बाळगली असती तर तो प्रसंग घडला नसता, अशी प्रतिक्रिया अनमोल केवटे यांचा कारचालक नवनाथ धाकपाडे यांनी दिली. या घटनेची नवनाथ धाकपाडे यांनीच लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
advertisement
अनमोल केवटे याला कार चालकाने सांगितलं होतं; उगीच वाद नको, तरीही...
चालक नवनाथ धाकपाडे याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री लातूरहून सोलापूरकडे जाताना खाडगाव स्मशानभूमीजवळ भरधाव जीप कट मारून पुढे गेली. त्यावेळी कट बसला नाही, पण गाडीचा वेग जास्त होता. त्यामुळे अनमोल केवटे यांनी त्याला गाडी नीट चालवता येत नाही का? असे म्हटले. त्यानंतर तो पुढे गेला आणि जीप आमच्या कारच्या समोर आडवी लावली. त्यावेळी परिस्थितीचा अंदाज मला आला होता. आपण गाडी मागे घेऊन निघून जाऊ, कशाला उगीचच वाद घालायचा, असं मी कवटेंना सांगितलं. पण त्यांनी माझं ऐकलं नाही.
तेवढ्यात समोरच्या जीपमधून ती माणसं खाली उतरली. त्यावेळी कवटे आणि सोनाली दोघंही खाली उतरले आणि त्यांच्यात आधी बाचाबाची झाली. यानंतर काही कळायच्या आतच समोरच्याने हत्यार काढले आणि केवटे यांना भोसकले. त्याच व्यक्तीने महिलेवरही वार केले, कार रिव्हर्स घेण्याची माझी इच्छा होती, केवटे यांनी ऐकले असते तर हा प्रकार टाळता आला असता, अशा शब्दांत कारचालकाने आपली प्रतिक्रिया दिल्याची माहिती पुढे आली आहे.
राष्ट्रवादी पवार गटाचा कार्यकर्ता
मृत अनमोल केवटे हा मूळ सोलापूर जिल्ह्याच्या मंद्रुप येथील रहिवासी होता. तो राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कार्यकर्ता असल्याचे सांगत असे. तो अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीमध्ये कार्यरत होता. याच कार्यक्रमानिमित्त तो आपली सहकारी सोनाली हिच्यासह लातूरला गेला होता. लातूरमधील कार्यक्रम आटोपून दोघंही कारने परत येत होते. याच वेळी हे हत्याकांड घडलं.