जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे पदाधिकारी नितीन देशमुख यांना मारहाण करण्यात आली. गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली. त्यानंतर पोलिसांनी आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला अटक केली. तर, रात्री उशिरा मारहाण करणाऱ्या पडळकरांच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र, या राड्याच्या काही तासांपूर्वीच विधिमंडळाची सुरक्षा व्यवस्था असणाऱ्या पोलिसांनी सुरक्षेबाबत अहवाल विधानसभा अध्यक्षांना दिला होता. त्यामध्ये विधिमंडळात असणार्या कार्यकर्त्यांच्या वाढत्या संख्येवरही चिंता व्यक्त करण्यात आली होती.
advertisement
पोलिसांच्या अहवालात काय?
पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानभवनातील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विधानसभा सदस्य आमदारांकडून अधिवेशनादरम्यान सातत्याने नियमभंग होत असल्याचा अहवाल विधानसभा सुरक्षेस जबाबदार पोलिसांकडून थेट अध्यक्षांकडे सादर करण्यात आला आहे, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.
अनेक आमदार सभागृहात प्रवेश करण्याआधी विधानभवनाच्या लॉबीत आपल्या कार्यकर्त्यांनाही सोबत नेतात. इतकंच नव्हे तर तेथेच दस्तावेजांवर स्वाक्षऱ्या करणे, फोटोसेशन घेणे असे प्रकार सर्रासपणे घडत आहेत. या गोष्टी केवळ एखाद्या पक्षापुरत्या मर्यादित नसून सर्वच पक्षांच्या आमदारांकडून हे प्रकार होत असल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला.
नियमांची पायमल्ली...
नियमांनुसार, विधानभवनाच्या लॉबीमध्ये केवळ आमदार आणि त्यांचे अधिकृत शासकीय स्वीय सहाय्यक (पीए) यांनाच प्रवेश देण्याची मुभा आहे. मात्र हा नियम वारंवार मोडीत काढला जात आहे. विशेष म्हणजे, सुरक्षारक्षकांनी अडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचेही अहवालात नमूद आहे.
अहवालात हेही निदर्शनास आणून देण्यात आले आहे की, काही आमदार त्यांच्या वाहनांद्वारे विधानभवनात प्रवेश करताना पास नसतानाही प्रवेश घेत आहेत. हे सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर असून, अशा घटनांकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशाराही दिला आहे.
विधानसभा अध्यक्षांनी दिले निर्देश...
या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्षांनी मंत्रालय सुरक्षा पोलिसांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, कोणतेही वाहन किंवा व्यक्ती ओळखपत्राशिवाय विधानभवनात प्रवेश करू देऊ नये, अशी सूचना विधानसभा अध्यक्षांनी दिली असल्याची माहिती समोर आली आहे.