प्रचार सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह इतर नेत्यांच्या भाषणात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याविरोधात मवाळ धोरण दिसून आले. तर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात आक्रमक भाषा वापरली जात असल्याचे म्हटले जात आहे. भाजपच्या बड्या नेत्यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवर अधिक टीका केली. तर, महाविकास आघाडीतील शरद पवार आणि उद्धव ठाकरे या मुख्य नेत्यांवर टीकेचे बाण मवाळ पद्धतीने सोडले गेले . आता जाहिरातींमध्येही हेच धोरण दिसून येत आहे.
advertisement
भाजपच्या जाहिरातील काँग्रेसवर वार
भाजपने आज दिलेल्या जाहिरातींमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळातील आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळातील दहशतवादी हल्ले, मुंबई महापालिका, कोविड काळातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर भाष्य करण्यात आले आहे. त्यानंतर जाहिरातीच्या शेवटी भाजपने Say No To Congress अर्थात काँग्रेसला नाकारा असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, यात महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा उल्लेख ठळकपणे करण्यात आला नाही. त्याऐवजी MVA असे म्हटले गेले आहे.
पवार-ठाकरेंबद्दल भाजपच्या वृत्तपत्र जाहिरातींमध्येही सॉफ्ट कॉर्नर दाखवण्यात येतोय का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
भाजपचा सेफ गेम?
लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी, अमित शाह यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर बोचरे वार केले होते. दुसऱ्या राज्यातील सभेत इंडिया आघाडीतील नेत्यांवर टीका करताना पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांची नकली संतान असा शब्द वापरला होता. तर, पवारांवरही टीका करताना भटकती आत्मा असा शब्द वापरला होता. या दोन्ही नेत्यांबद्दल राज्यात सहानुभूतीची लाट निर्माण झाली होती.
भाजपसाठी काँग्रेसचे आव्हान?
भाजप आणि काँग्रेसमध्ये काही जागांवर सरळ लढत होणार आहे. त्यातील बहुतांशी लढती या विदर्भात होणार आहेत. राज्यातील सत्ता समीकरणात विदर्भ मोठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे विदर्भात अधिकाधिक जागांवर विजय मिळवण्यासाठी काँग्रेस आणि भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत.
