रामटेकच्या गद्दारीवरून मविआत वादाचे फटाके वाजू लागले आहेत. मविआतील जागा वाटपात शिवसेना ठाकरे गटाला ही जागा सोडण्यात आली होती. तर, काँग्रेसकडून बंडखोर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार बंडखोर राजेंद्र मुळक यांचा प्रचार करीत आहेत. यावर शिवसेना ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी संताप व्यक्त केला आहे. जाधव यांनी सुनिल केदार यांच्यावर सडकून टीका केली. भास्कर जाधव यांनी म्हटले की, शिवसेना स्वतःच्या हिंमतीवर गद्दारी करणाऱ्यांशी सामना करण्यास समर्थ आहे. आमच्या उमेदवाराने गद्दारी केली म्हणून रामटेक मध्ये काँग्रेसने गद्दारी करून उमेदवार देणे हे पण गद्दारीच आहे. सुनिल केदार हे मारुतीच्या बेंबीतील विंचू आहे. हा विंचू सातत्याने शिवसैनिकांना डंक करत असल्याची जहरी टीका जाधवांनी केली.
advertisement
पूर्व विदर्भात 28 जागा आहेत. त्या ठिकाणी फक्त एकाच जागेवर शिवसेना ठाकरे गट जागा लढवत आहे. त्या एका जागेवरही सुनिल केदार गद्दारी करत आहे. आमच्यासोबत झालेल्या गद्दारीचा बदला आम्ही घेऊ, तो बदला इतरांनी गद्दारी करून घ्यावा, इतकी कमकुवत शिवसेना झाली नसल्याचे भास्कर जाधव यांनी म्हटले.
उद्धव ठाकरेच्या अपमानाचा बदला आशिष जयस्वाल यांच्याकडून घेण्यासाठी आम्ही सक्षम आहोत असं म्हणत रामटेक विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार विशाल बरबटे सुनील केदार यांना सुनावले. अधिकृत उमेदवार असताना बंडखोर राजेंद्र मुळक यांचा प्रचार करत असल्यामुळे तुम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळला तरी पुरे आहे. इतके उपकार करू नका अशा शब्दात ठाकरे गटाचे उमेदवार बरबटे यांनी टोला लगावला.
सुनिल केदार काय म्हटले होते?
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आमदार आशिष जयस्वाल यांनीच उद्धव ठाकरेंची साथ सोडली. 'मातोश्री'च्या विरोधात ते बोलत आहेत. त्यांना सत्तेच माज आला आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी बेईमानी केल्याने त्यांना त्याची जागा दाखवायची आहे. याकरिता आम्ही राजेंद्र मुळक यांना उभे केले असल्याचे सुनील केदार यांनी जाहीर सभेत म्हटले. उद्धव ठाकरे यांचे मीठ खाऊन अपमान करणाऱ्या माणसाला जागा दाखवण्यासाठी ही भूमिका घेतली आहे. ऐकून घे आशिष जयस्वाल हा सुनील केदार मागून वार करत नाही, समोरून वार करतो, असेही त्यांनी म्हटले.
