पवार कुटुंबात राजकारणाने वितुष्ट?
अजित पवारांकडे असलेल्या आमदारांच्या बळावर राष्ट्रवादी काँग्रेस हा अजित पवारांचा असल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला. राष्ट्रवादी पक्ष ताब्यात आल्यानंतर अजित पवार गटाकडून शरद पवारांवर टीका करणे टाळण्यात आले. तर, रोहित पवारांवर टीकेचे बाण सोडण्यात आले होते. दुसरीकडे बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेविरोधात अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवार यांनाच मैदानात उतरवले होते. त्यावेळी सुनेत्रा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने अनेकांनी नाराजीचा सूर लावला होता. या निवडणुकीमुळे पवार कुटुंबात दुरावा आल्याचे म्हटले होते. यंदाच्या दिवाळीतही अजित पवार हे गोविंदबागेतील दिवाळीत सहभागी झाले नाहीत. पाडव्याच्या निमित्ताने पवार कुटुंब आपल्या कार्यकर्त्यांची भेट घेतात. यंदा मात्र, अजित पवार यांनी गोविंदबागेऐवजी काटेवाडीतील आपल्या घरी कार्यकर्त्यांची भेट घेत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. विधानसभा निवडणुकीतही अजित पवारांविरोधात युगेंद्र पवार अशी लढत झाली. त्यावेळीही पवार कुटुंब आमनेसामने आले.
advertisement
पवार कुटुंबातील दुरावा संपतोय?
राजकारणामुळे पवार कुटुंब दुभंगलेल्या स्थितीत आल्याची चर्चा होती. पवार कुटुंबात दुरावा आल्याचे म्हटले जात असताना दुसरीकडे काही घटनांनी मात्र, पवारांमधील दुरावा कमी होत असल्याचे म्हटले जात आहे. त्यासाठी काही घटनांचा दाखला दिला जात आहे. निवडणूक निकालानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत युगेंद्र पवार आणि अजित पवार यांची तुलना होऊ शकत नसल्याचे म्हटले होते. युगेंद्र ऐवजी दुसरा उमेदवार उभा केला असता तर निवडणूक गंभीर झाली नसती असेही त्यांनी म्हटले.
दुसऱ्या एका घटनेत कराडमध्ये राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवगंत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिना निमित्ताने प्रीतिसंगमवर अजित पवार आणि रोहित पाटील हे आमनेसामने आले. यावेळी काका-पुतण्यात संवाद झाला. रोहित पवार यांनी अजित पवारांचे आशिर्वाद घेतले. तर, तू थोडक्यात वाचला. माझी सभा झाली असती तर काय झालं असतं, असे म्हटले. तर, दुसरीकडे रोहित पवारांकडून पराभव स्वीकारणारे भाजप उमेदवार राम शिंदे यांनी देखील रोहित पवारांना अजित पवारांनी पडद्या आडून मदत केली असल्याच्या आशयाचे वक्तव्य केले. त्यामुळे अजित पवारांनी रोहित पवारांना मदत केली असल्याचे म्हटले जात आहे.
तिसरी घटना म्हणजे, युगेंद्रच्या पराभवावर अजित पवारांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यावेळी त्यांनी युगेंद्रला निवडणुकीत उभं करायला नको हवं होतं असे म्हटले. युगेंद्रला अधिक अनुभवाची गरज होती, असे अजित पवारांनी म्हटले. आपल्या पुतण्याबाबत बोलताना अजित पवारांच्या बोलण्यात एक आपुलकीपणाची भावना दिसून आली होती.
