मुंबई : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपली निवडणूक रणनीती निश्चित केली आहे. या पार्श्वभूमीवर कोकण व ठाणे विभागातील वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महायुती की स्वबळ यावरही चर्चा करण्यात आली. त्याशिवाय, या बैठकीत भाजपने आता इनकमिंगसाठी भाजपचे दरवाजे खुले करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे येत्या काही दिवसांत मोठ्या उलथापालथी होण्याच्या शक्यता आहेत.
advertisement
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग सुरू झाली असून सगळ्याच राजकीय पक्षांनी आपल्या बैठकांना जोर लावला आहे. आगामी निवडणुकीतील युती-आघाडीच्या समीकरणावर चर्चा करताना पक्ष प्रवेशाबाबतही चर्चा सुरू झाल्या आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीतही पक्ष प्रवेशाबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात सूत्रांनी दिली.
भाजपच्या बैठकीत स्पष्ट निर्देश दिले की, महाविकास आघाडीतील स्थानिक पातळीवरील प्रभावशाली नेते भाजपमध्ये यायची इच्छा व्यक्त करत असतील, तर त्यांना खुलेपणाने पक्षात सामावून घ्या, अशी सूचना देण्यात आली. मात्र, इतर पक्षांच्या नेत्यांना घेताना स्थानिक कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेण्याचेही आदेश वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आले. पक्षसंघटन मजबूत ठेवत नवे चेहरे समाविष्ट करण्याचा तोल सांभाळणे हीच आगामी निवडणुकांसाठी भाजपची प्राथमिक रणनीती असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बैठकीत चर्चा झाल्यानुसार, येणाऱ्या निवडणुका या ‘मिनी विधानसभा’ म्हणून पाहिल्या जात असून, प्रत्येक जिल्ह्यात भाजपची ताकद वाढवण्यासाठी स्थानिक पातळीवर नेत्यांची ‘इनकमिंग’ वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार इनकमिंग?
विशेषतः वसई-विरार, नवी मुंबई, ठाणे आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर नवे नेते आणि कार्यकर्ते प्रवेश करणार, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रवेशामुळे महाविकास आघाडीतील स्थानिक पातळीवरील समीकरणांवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.
राज्यभरात पक्षांतराची हालचाल वाढल्याने, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी लवकरच रंगणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.