महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने दणदणीत विजय मिळवला. या विजयात भाजप सर्वाधिक उमेदवार निवडून आले. त्या पाठोपाठ शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. सर्वाधिक उमेदवार निवडून आल्यामुळे भाजपचे नेते त्यांचाच मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा करत आहे. मात्र, ज्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला भरघोस यश मिळालं त्यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करून महाराष्ट्रात बिहार प्रमाणे मुख्यमंत्री पॅटर्न राबवण्याचं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं नियोजन असल्याचं वरिष्ठ सूत्रांनी सांगितले आहे. भाजपच्या या निर्णयामागे काही महत्त्वाची कारणे असल्याचे सांगण्यात येत आहे.
advertisement
एनडीएमधील राजकारण महत्त्वाचं
भाजपचं एनडीए मधलं राजकारणही महत्वाचं आहे. गरज असेपर्यंत भाजप मित्रपक्षांना वापरतो… शिंदेंची गरज संपली, आता भाजपचा मुख्यमंत्री होणार’, ‘मित्रपक्षांना फसवण्याची भाजपची खोड’, ‘उद्धव ठाकरेंप्रमाणे शिंदेंना दगाफटका होणार...असा आरोप विरोधक विशेषत: ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. भाजप शब्दावर ठाम असतो, हा संदेश महाराष्ट्रातही देण्यासाठी घवघवीत यशानंतरही बिहारप्रमाणे महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद देण्याबाबत भाजपच्या केंद्रीय नेत्यांचा विचार सुरू आहे.
केंद्रात एनडीए मजबूत ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे भाजप मित्रपक्षांवर अन्याय करत नाही हा मेसेज देण्याचा प्रयत्न होऊ शकतो. एनडीएमध्ये शिवसेना चौथा सर्वात मोठा मित्र पक्ष आहे. इतर राज्यातील मोठ्या विजयानंतरही भाजपच्या केंद्रातील सर्वोच्च नेतृत्वाने दूरदृष्टीने अनपेक्षित निर्णय घेऊन विजयी समीकरण कायम ठेवले होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे लक्ष
महाराष्ट्रात पुढील तीन महिन्यात सर्वच प्रलंबित महापालिकांच्या आणि नगरपालिकांच्या निवडणूका होणार आहेत. या निवडणुकीतही विजयी चेहरा म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच लोकप्रियतेचा फायदा महायुतीला होणार असल्याचा अंदाज आहे. महायुती एकसंघ आणि भक्कम ठेवणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलू नये, असं राजकिय समीकरण मजबूत होताना दिसत आहे.
