पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात नोकरी, शिक्षण किंवा व्यवसायासाठी स्थायिक असलेले नागरिक दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या संख्येने आपल्या गावाकडे रवाना होणार आहेत. या पार्श्वभूमीवर परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाने तब्बल 598 जास्तीच्या एसटी बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या जादा बसेसचा लाभ प्रवाशांना 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत घेण्यात येणार आहे. त्यामुळे हजारो नोकरदारांना आपल्या गावी जाण्यासाठी सोयीस्कर व्यवस्था उपलब्ध होणार, हे नक्की. पुण्यासोबतच पिंपरी- चिंचवडमधूनही नोकरदारांसाठी बस स्थानकातून विशेष एसटी बस सोडण्यात येणार आहे.
advertisement
यावर्षी पहिल्यांदाच पिंपरी- चिंचवड आगारातून नोकरदारांसाठी विशेष एसटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. पिंपरी- चिंचवड परिसरातून मोठ्या संख्येने प्रवासी थेट गावी जाऊ शकतील. शिवाय शिवाजीनगर आणि स्वारगेट या प्रमुख आगारांमधूनही जादा बस सोडण्यात येणार आहेत. या बससेवा महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांमध्ये पुरवल्या जाणार आहेत. त्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, लातूर, बीड, परभणी, अकोला आणि नागपूरसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये विशेष बस सेवा पुरवली जाणार आहे. पुणे विभागातून ही अतिरिक्त बसची सोय खालीलप्रमाणे उपलब्ध असेल.
- शिवाजीनगर आगारातून: 80 बस
- स्वारगेट आगारातून: 112 बस
- पिंपरी-चिंचवड आगारातून: 396 बस
दिवाळीला अवघे काही दिवसच शिल्लक राहिलेले असताना ज्या प्रवाशांना आपल्या गावी जायचे आहे, त्यांनी एसटीचे तिकिट बुकिंग करण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केली आहे. एसटी महामंडळाने या जादा बसचे ऑनलाईन आरक्षण सुरू केले आहे. त्यामुळे रेल्वेचे तिकीट न मिळालेल्या प्रवाशांना हा एक उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे.
प्रवासी एसटी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://msrtc.maharashtra.gov.in) किंवा त्यांच्या मोबाइल ॲपवरून आपल्या प्रवासाचे तिकीट सहज बुक करू शकतात. गर्दी आणि ऐनवेळी होणारी गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी आधीच आरक्षण करण्याचे आवाहन महामंडळाने केले आहे. महामंडळाच्या या निर्णयामुळे गर्दीच्या काळात खासगी वाहतुकीच्या तुलनेत सर्वसामान्य प्रवाशांना सुरक्षित प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
दरम्यान, राज्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे दिवाळीच्या हंगामात एसटी महामंडळाने केलेली 10 टक्के हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही दरवाढ रद्द करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले. साधी, निमआराम (हिरकणी), शयन आसनी, वातानुकूलित शिवशाही आणि जनशिवनेरी अशा सर्व प्रकारच्या बसगाड्यांना ही वाढ लागू होणार होती. मात्र, आता ही हंगामी दरवाढ रद्द झाल्यामुळे या काळात प्रवाशांना अतिरिक्त भाडे मोजावे लागणार नाही. या निर्णयामुळे राज्यातील जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.