मोवाड म्हणजे सोन्याचं कवाड
30 जुलै 1991 ला घडलेल्या या घटनेचे साक्षीदार असणारे मोवाड या गावातील माजी मुख्याध्यापक रामकृष्ण रंभाड यांनी लोकल18 शी बोलताना माहिती दिली. ते सांगतात की, मोवाडची नगर परिषद नागपूर जिल्ह्यातील सर्वात जुनी ब्रिटिशकालीन नगरपरिषद आहे. या नगर परिषदेची स्थापना स्वातंत्र्यापूर्वीच म्हणजेच 17 मे 1867 ला इंग्रजांनी केली. विणकरीचा व्यवसाय, शेती व्यवसाय, मोठी बाजारपेठ आणि इतरही वैभव पाहून 10 हजार लोकसंख्या असूनही इंग्रजांनी तेथील वैभव संपन्नता पाहून नगरपरिषदेचा दर्जा दिला. या भागात मोहाची झाडे जास्त प्रमाणात होती. या मोहाच्या झाडामुळेच या गावाला मोवाड असे नाव पडले. आता या नगरपरिषदेला 152 वर्षे पूर्ण होत आहे.
advertisement
एका क्षणात गाव उद्ध्वस्त झालं
वैभव संपन्न असलेल्या या गावासाठी 30 जुलै 1991 ची पहाट काळोखाची ठरली. जाम नदीवर असलेला बांध फुटला आणि मोवाडसह 13 गावांना या पुराचा फटका बसला. यात खैरगाव, थुगावदेव, मदना, जलालखेडा आणि आणखी काही गावांचा समावेश होता. सलग तीन ते चार दिवसांपासून पाऊस सुरू होता. जाम नदी आणि वर्धा नदी ओसंडून वाहत होती.
नगर परिषदेकडून धोक्याची घंटा मिळाली होती. गावकरी सजग झाले. आपला जीव मुठीत घेऊन पळू लागले. कोणी बिल्डिंगचा आधार घेतला, तर कुणी मिळेल तो आधार घेऊन आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. बाजारातील बंडू गुप्ता यांच्या इमारतीवर लोक जीव वाचविण्यासाठी गेले. अशातच ती इमारत कोसळली त्यात कित्येक लोकांना आपला जीव गमवावा लागला. काही क्षणात संपूर्ण गाव जलमग्न झालं आणि होत्याच नव्हतं घडून गेलं, असं ते सांगतात.
204 जणांना जलसमाधी
पुढे ते सांगतात की, शासकीय आकड्यानुसार 204 जणांना जलसमाधी मिळाली. पण वास्तविक आकडा हा सांगता येणार नाही. कारण प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार कित्येक लोक बेपत्ता झाले होते. अनेक मुली माहेरी आल्या होत्या. काही माहेरी गेल्या होत्या. त्यामुळे हा आकडा जास्त असू शकतो. या पुरातून लोकांना वाचविण्यासाठी अनेकांनी धडपड केली. अनेकांचे कुटुंब डोळ्यासमोर वाहून गेले. त्यातील पोलीस हवालदार समाधान इंगळे हे आपल्या कुटुंबाला वाचविण्यासाठी गेले होते. त्या प्रयत्नांत त्यांचाही अंत झाला. त्याचबरोबर अंमलदार वामन मेंढे यांनी सुद्धा अनेकांना वाचविण्याचा प्रयत्न केला. पण, यांच्याही त्यात अंत झाला. या दोघांनीही आपले प्राण गमावले.
शेतीचं नुकसान
शेतीच देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. गावाचे पुनर्वसन करण्यासाठी 450 एकर जमीन गेली. इंदिरानगरमध्ये 50 एकरच्यावर जमीन गेली. रेल्वे लाईनमध्ये 200 ते 300 एकर जमीन, पुरामुळे खरवडत गेली ती 200 एकर जमीन अशी 1 हजार एकर जमीन यात गेली. त्यामुळे जो शेतकरी वर्ग होता तो मजूर वर्ग झाला. विणकाम करणारे व्यावसायिक कमी झाले. अशाप्रकारे समृद्ध शहराची संपूर्ण दुरावस्था त्या पुरामुळे झाली.
1991 च्या पुरातून वाचलेल्या काही इमारती अजूनही पुराची साक्ष देतात. त्या पडक्या इमारती त्या भयावह स्थितीची आठवण करून देतात. प्रत्येकाने त्या पुरात काही न काही गमावलं. त्याची जखम आजही प्रत्येकाच्या मनावर आहे. 35 वर्ष झालीत तरी आजही डोळ्यात पाणी आणणारा तो प्रसंग होता, असे ते सांगतात.