राष्ट्रीय कला अॅकॅडमीच्यावतीने दरवर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुण्यातील टिळक पुतळा ते अलका चौक या मार्गावर सुमारे 11 चौकांमध्ये 30 ते 35 फूट लांबीचा रांगोळीचा गालिचा काढला जातो. या रांगोळ्यांमधून पर्यावरण संवर्धन, स्त्री भ्रूणहत्या, वाहतूक समस्या, प्रदूषण, सामाजिक असमानता, असे लोकांना भिडणारे आणि जागृती घडवणारे विषय मांडले जातात.
Dagdusheth Ganpati: दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक, भव्य रथ अन् सप्तरंगी सजावट, यंदा काय खास?
advertisement
या उपक्रमात महिलांचा विशेष सहभाग आहे. पूर्वी घरापुरती मर्यादित असलेली रांगोळी रस्त्यावर आणून समाजाशी जोडावी, हा या मागचा उद्देश आहे. त्यामुळे अनेक गृहिणींनी घराबाहेर पडून या सेवेत सहभाग घेतला आहे. गणपती चरणी सेवा देण्याच्या भावनेतून सुरू झालेला हा उपक्रम आज हजारो पुणेकरांचं लक्ष वेधून घेतो.
या अनोख्या उपक्रमासाठी दरवर्षी सुमारे 1 टन पांढरी रांगोळी, 750 किलो रंगीत रांगोळी आणि 500 किलो गुलाल वापरला जातो. दोन महिने आधीपासूनच यासाठी नियोजन सुरू केलं जातं. यंदा 'कचरा व्यवस्थापन' हा विषय घेण्यात आला आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी या विषयाशी संबंधित विविध संदेश देणाऱ्या रांगोळ्या रेखाटल्या जाणार आहेत.
राष्ट्रीय कला अॅकॅडमीचे सदस्य अमर लांडे म्हणाले, "लोकांच्या काळजाला भिडणारे आणि अस्वस्थ करणारे विषय आम्ही निवडतो. कारण, आम्हाला समजापर्यंत एक संदेश पोहोचवायचा असतो. रांगोळी ही केवळ सजावटीपुरती मर्यादित राहू नये, ती लोकजागृतीसाठी उपयोगी पडावी हेच आमचं उ्दिष्ट आहे." आज राष्ट्रीय कला अॅकॅडमीने कलाविश्वात स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. तरुणाईला कला, समाजसेवा आणि प्रबोधन यांची शिकवण देण्याचं कार्य ही अॅकॅडमी करत आहे.