मासिक आणि त्रैमासिक पास सवलतीची योजनेअंतर्गत प्रवाशांना 60 दिवसांचे भाडे भरून 90 दिवसांचा प्रवास करण्याची मुभा मिळतेय. प्रवाशांच्या सोयीसाठी तसेच ई- बस सेवेला अधिक प्रतिसाद मिळवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. ई- बस सेवेत पास प्रणाली सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत होती. विशेषतः नोकरी किंवा व्यवसायानिमित्त रोज एकाच मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा लाभ होणार आहे. शिवाय, आता दिवाळीच्या सुट्ट्यांमध्येही अनेक नागरिक पर्यटनासाठी बाहेर फिरण्यासाठी जात असतात. त्यांच्यासाठीही योजना अधिक सोयीस्कर ठरू शकते.
advertisement
सध्या महामंडळाच्या ताफ्यात ई-बस प्रकल्पातील 448 बसेस आणि शिवाई प्रकल्पातील 50 ई-बसेस कार्यरत आहेत. त्या बसेसची संख्या टप्प्या टप्प्याने वाढवण्याचा मानस असल्याचे सरनाईक म्हणाले. महामंडळाने प्रवाशांसाठी घेतलेल्या पासच्या निर्णयामुळे दैनंदिन प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, पर्यावरणपूरक व आरामदायी प्रवासासाठी ई-बसचा वापर वाढण्यास मदत होईल, असे मत परिवहन मंत्र्यांनी व्यक्त केले आहे. मुंबईपासून जवळ असलेल्या ठाणे- अलिबागसारख्या मार्गावर मोठ्या संख्येने दैनंदिन प्रवासी ई-बसेसचा लाभ घेतात. या योजनेचा प्रवाशांना फायदा होण्याची शक्यता एसटी कर्मचारी काँग्रेसच्या सरचिटणीसांनी व्यक्त केली आहे.
9 मीटर ई-बस, 12 मीटर ई-बस आणि ई- शिवाई या बसेसला मासिक आणि त्रैमासिक पास सवलतीची योजना असणार आहे. परंतू ई- शिवनेरीला ही योजना नसेल. मासिक पासबद्दल बोलायचं तर, 20 दिवसांच्या प्रवासाचे भाडे आकारून प्रवाशांना 30 दिवसांचा पास मिळेल आणि त्रैमासिक पासमध्ये 60 दिवसांचे पैसे भरून प्रवाशांना 90 दिवसांचा पास मिळेल. उच्च सेवा वर्गाचा (ई-बस) पास असलेले प्रवासी निमआराम किंवा साध्या बसमधून प्रवास करू शकतील. निमआराम किंवा साध्या बसचा पासधारक ई-बसने प्रवास करत असल्यास, दोन्ही सेवांतील भाड्याचा फरक १०० टक्के दराने भरावा लागेल, असा दोन्हीही पासचा फरक असेल.