ऐन गणेशोत्सव काळात पुणे शहरात नात्यांमध्येच रक्तरंजित थरार पाहायला मिळाला. आंदेकर-कोमकर टोळी युद्धातून गुन्हेगारी जगताशी कसलाही संबंध नसणाऱ्या महाविद्यालयीन तरुण आयुषची हत्या करण्यात आली. माझ्या मुलाची हत्या करून म्हणजेच वनराजला संपवून मुलगा नसल्याची वेदना मला दिली, आता तुलाही (जायवाला) मुलगा नसतो त्याचे काय दु:ख असते हे दाखविण्यासाठी बंडू आंदेकरच्या टोळीने आयुषची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. आयुषची आई कल्याणी कोमकरने पोलीस तक्रारीत बंडू आंदेकर आणि त्यांच्या टोळीविरोधात तक्रार दिली आहे. बंडू आंदेकर, वृंदावनी वाडेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, अमन पठाण, सुजल मेरगु या ६ आरोपींची नावे आयुषच्या हत्या प्रकरणात आहेत.
advertisement
हत्या कशी केली, कुणाकुणाचा सहभाग? रेकी ते मर्डर
एकूण १३ जणांनी आयुषच्या हत्येचा कट रचला होता. त्यापैकी दोघांनी भवानी पेठ मधील पार्किंगमध्ये जात पिस्तूलने फायरिंग करून आयुषचा खून केला. बाकीच्या आरोपींच्या सांगण्यावरून हा खून करण्यात आला. आरोपींकडील पिस्तूल आम्हाला जप्त करायचे आहेत. पिस्तूल आणि गोळ्या कुठून आणल्या याचा तपास करायचा आहे. इतर पाच आरोपी फरार आहेत, त्यांचा पत्ता याच आरोपींना माहिती आहे. त्यांना शोधायचं आहे. यासंदर्भातील सखोल तपास करायचा असल्याचे सांगून पोलिसांनी आरोपींची पोलीस कोठडी मागितली.
तसेच दाखल गुन्ह्यातील आरोपींनी सोमनाथ गायकवाड यांच्या घराची देखील रेकी केली होती, असा धक्कादायक दावा पोलिसांनी केला. याच आरोपींवर भारती विद्यापीठ पोलिसांत गुन्हा दाखल असल्याचेही पोलिसांनी सांगितले. आंदेकर टोळीनेच आयुषचा खून केला, असा दावाही पोलिसांनी केला.
आंदेकर टोळीने याआधी आंबेगावमध्ये सोमनाथ गायकवाड याच्या घरी हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपींची ओळख परेड घ्यायची आहे. या प्रकरणातील अनेक आरोपी हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत. यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. एका एका आरोपीवर ३-३ किंवा २-२ गंभीर गुन्हे दाखल आहेत. ज्यांनी हत्या केली त्यांचे कपडे जप्त करायचे आहे. हे टोळी युद्ध असून अनेकांनी अनेकांचा कट रचून खून केल्याच्या आतापर्यंतच्या घटना असल्याचे पोलिसांनी सांगितले.