तिरुपती आणि शिर्डी या दोन प्रमुख आध्यात्मिक स्थळांदरम्यान प्रवास करणाऱ्या लाखो भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता, या मार्गावरील रेल्वे सेवांची संख्या वाढवण्याची तातडीची गरज होती. हाच मुद्दा अधोरेखित करत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दि. ११ जून २०२४, दि. १६ जुलै २०२४ आणि दि. २० जुलै २०२५ रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्राद्वारे शिर्डी तिरुपती रेल्वेच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी प्रामाणिकपणे आणि सातत्याने केली होती. या मागणीला अखेर सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून दि. ९ डिसेंबर २०२५ पासून १७४२५/१७४२६ तिरुपती–साईनगर शिर्डी या नवीन साप्ताहिक रेल्वेगाडीच्या उद्घाटनाची घोषणा करण्यात आली आहे.
advertisement
मंत्री छगन भुजबळ यांच्या मागणीला प्रतिसाद देत घेण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवजी आणि रेल्वे मंत्रालयाचे आभार मानले आहे. भाविकांच्या सुविधेसाठी घेतलेला हा निर्णय निश्चितच दूरदृष्टी दाखवणारा आणि अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
तिरुपती आणि शिर्डी रेल्वेने जोडली जाणार
या निर्णयामुळे नवीन सेवेच्या माध्यमातून तिरुपती आणि शिर्डी ही दोन अत्यंत महत्त्वाची आणि गर्दीची आध्यात्मिक केंद्रे आता नियमित रेल्वेने परस्परांशी जोडली जातील, ज्यामुळे भाविकांचा प्रवास अधिक सोयीस्कर व तणावरहित होणार आहे. उत्तर महाराष्ट्रातून तिरुपतीसाठी आतापर्यंत केवळ एका साप्ताहिक गाडीवर अवलंबून असलेल्या प्रवाशांना आता वाढीव फेऱ्या उपलब्ध होतील. ही रेल्वे शिर्डीहून सुटणार असल्याने तिकीट उपलब्धता वाढेल आणि मोठ्या प्रतीक्षा यादीची समस्या अत्यंत कमी होईल.
शिर्डी तिरुपती रेल्वेला नगरसुल रेल्वे स्टेशनवर थांबा मिळाल्याने आपल्या येवला मतदारसंघातील स्थानिक रहिवाशांपासून ते दूरवरून येणाऱ्या पर्यटकांसाठी तिरुपतीला जाण्याची सोय उपलब्ध होईल. वाढीव रेल्वे सुविधा उपलब्ध झाल्यामुळे तिरुपती आणि शिर्डी या दोन्ही ठिकाणांच्या धार्मिक पर्यटनात मोठी वाढ होईल, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही थेट चालना मिळेल. ०७६३७/०७६३८ शिर्डी तिरुपती हॉलिडे स्पेशल आता नियमित गाडीमध्ये परिवर्तित झाल्याने आकारण्यात येणारे १.३ पट प्रवासी भाडे आता कमी होईल तसेच सेवा गुणवत्तेवरही सकारात्मक होणार आहे.
