शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यावर भाष्य केले. संजय राऊत यांनी म्हटले की, दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचे खासदार निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. त्यांनी पुढे म्हटले की, राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत. त्यांनी पुराव्यांसह मतदार यादीतील पोलखोल केली आहे. तरीही निवडणूक आयोग काही करत नसेल तर याचा अर्थ स्पष्ट आहे की, त्यांनी तोंडात बोळा कोंबला असल्याची घणाघाती टीका केली.
advertisement
तशी लोक आम्हालाही भेटली, उद्धव ठाकरेंनी...
संजय राऊत यांनी शरद पवार यांनी केलेल्या दाव्याला दुजोरा देणारा गौप्यस्फोट केला. संजय राऊत यांनी म्हटले की, लोकसभा, विधानसभेच्या वेळी काही लोक आम्हाला भेटले होते. शरद पवारांना निवडणुकीपूर्वी काही लोक भेटले होती. 160 जागांवर विजय मिळवून देतो, त्यासाठी विशिष्ट रक्कम द्या अशी ऑफर केल्याचे पवारांनी म्हटले. आता मात्र, आम्हाला यात तथ्य असल्याचे वाटत आहे, असे राऊत यांनी म्हटले.
उद्धव ठाकरेंनाही ऑफर..
संजय राऊत यांनी म्हटले की, लोकसभा आणि विधानसभेच्या वेळी काही लोक आम्हालाही भेटले आहेत. त्यावेळी त्यांनी लोकसभेची निवडणूक तुम्हाला जिंकून देऊ असे म्हटले. त्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या ऑफरला नकार दिला. देशातील एकूण वातावरण पाहता, आम्ही लोकसभा जिंकूच असे त्यांनी म्हटले. निवडणुकीचे निकाल आमच्या अपेक्षेनुसार लागले. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यानही पुन्हा ती लोक भेटली.
तुम्ही आम्हाला 60-65 जागा अडचणीच्या सांगा, आम्ही निवडणूक जिंकून देतो. ईव्हीएम आणि इतर गोष्टीच्या माध्यमातून तुमचं काम होईल, असे त्यांनी सांगितले . आम्ही त्याला नकार दिला. तुम्हाला आवश्यकता वाटत नसली तरी समोरच्या लोकांनी मतदारयादी आणि इतर गोष्टींमुळे आम्हाला तुमचं अपयश दिसत आहे, मात्र आम्ही तुम्हाला मदत करू इच्छितो, असे त्या लोकांनी उद्धव ठाकरेंना म्हटले होते. त्यानंतर आता पवारांनी केलेला दावा हा सत्य आहे असं वाटत असल्याचे संजय राऊतांनी म्हटले.
आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट काढण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पूर्ण पारदर्शक असेल आम्हाला वाटत नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटले. मुंबई महापालिका ही मराठी माणसाच्या ताब्यात आहे. त्यातून शिवसेनेला पराभूत करण्यासाठीच्या कटात निवडणूक आयोग देखील आहे का, अशी शंका वाटत असल्याचे संजय राऊतांनी म्हटले.