सातारा : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भाग डोंगराळ भाग असून निसर्गाने नटलेला परिसर म्हणून ओळखला जातो. या परिसरात गेल्या काही दिवसात पावसाने मोठी हजेरी लावल्याने छोटे नदी, नाले, ओढे त्याचबरोबर धबधबे, तलाव मोठ्या प्रमाणावर भरलेले पाहायला मिळाले.
सातारा जिल्ह्यात याच डोंगर भागात 7 मोठे धबधबे आहेत तर 22 मध्यम प्रमाणात असलेले धबधबे आहेत. यासोबतच 100 पेक्षा जास्त छोटे धबधबे पाहायला मिळतात. गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यात पश्चिम भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे या भागाचे सौंदर्य खोलायला सुरुवात झाली आहे. यामुळे या भागातील डोंगरदर्यांमधून खळखळ वाहणाऱ्या आणि पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या धबधब्यांचे मनमोहक आणि आक्रार विक्राळ रूप पाहायला मिळत आहे.
advertisement
या भागात पावसाची सरासरी जास्त असल्याने सातारा जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून पर्यटन स्थळावर प्रशासनाकडून रोटेशनमध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि पोलीस विभाग यांना सूचना देऊन पर्यटकांची काळजी घेण्यासाठी विविध उपाय योजना सुरू करण्यात आल्या आहेत. ज्या भागात पावसाचे प्रमाण जास्त असेल त्या भागातील धबधबे बंद असल्याचे सांगून पर्यटकांना त्यांच्या सुरक्षतेच्या हेतूने थांबवण्यात यावे, अशा सूचनाही साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी केल्या आहेत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे साताऱ्यातील केळवली धबधबा हा पर्यटनासाठी बंद करण्यात आला असल्याचे देखील सांगितला आहे. या ठिकाणी गेल्या काही दिवसांपूर्वी एक युवक पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेला. त्यामुळे हा केळवली धबधबा पर्यटनासाठी बंद करण्यात आला आहे. शहरापासून अत्यंत दुर्गम डोंगरी भागात असलेला या केळवली धबधब्या जवळ कोणताही अनुसूचित घटना घडू नये, म्हणून प्रशासनाने हे पर्यटनस्थळ तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहे. यामुळे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची निराशा होत आहे.
त्याचबरोबर साताऱ्यातील ठोसेघर, ओझर्डे धबधबा, वजराई धबधबा, महाबळेश्वर मधील लिंगमळा धबधबा, यांसारखे मोठमोठे धबधब्यांवर पोलीस आणि वन विभागाच्या माध्यमातून बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्याचबरोबर पर्यटकांच्या सुरक्षतेसाठी विविध उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली.
सातारा शहरातून त्याच बरोबर महाराष्ट्रातून आणि देशभरातून येणाऱ्या पर्यटकांनी अति उत्साहामध्ये वाहणाऱ्या पाण्यामध्ये जाणे टाळावे, पर्यटकांनी आपली काळजी घ्यावी, धबधब्यांचा आनंद लुटावा. मात्र, कोणत्याही पर्यटकांच्या जीवावर बेतणार नाही, याची काळजी घेतली जावी. यासाठी आम्ही आमच्या पद्धतीने काही धबधबे बंद केले आहेत, असेही ते म्हणाले.





