ज्येष्ठ नेते शरद पवार हे आज सकाळपासून पुण्यातील मोदीबाग इथे आहेत. पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना त्यांनी महत्त्वाचे राजकीय भाष्य केले. त्यांचं वक्तव्य हे पुन्हा राजकीय भूकंप करणार का अशी चर्चा सुरू झाली. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याबाबत भाष्य केले.
शरद पवार यांनी काय म्हटले?
शरद पवार यांनी म्हटले की, सगळ्यांची विचारधारा एक आहे त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र आले तर आश्चर्य वाटायला नको. जे शिंदेसोबत गेले ते पुन्हा आमच्यासोबत आले तर आश्चर्य वाटायला नको. याचा निर्णय अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी घ्यायचा आहे. त्यांना निवडणुका लढवायच्या आहेत. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घ्यायचा आहे. मी निवडणूक लढणार नाही. त्यामुळे मी या प्रक्रियेत नसल्याचेही पवारांनी स्पष्ट केले.
advertisement
शरद पवारांच्या वाक्याचा अर्थ काय?
शरद पवार यांनी आता आपण राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या प्रक्रियेत नसणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता शरद पवार राजकीय निवृत्ती घेणार का, य़ाची चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार यांनी आपण यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्याशिवाय, शरद पवार यांनी याआधी देखील एका कार्यक्रमात आपल्या राजकीय निवृत्तीचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, त्यावेळी एकसंध असलेल्या राष्ट्रवादीतील नेत्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला. मात्र, अजित पवारांनी शरद पवारांच्या निर्णयाला पाठिंबा दिला होता.
अजित पवारांनी राष्ट्रवादीत फूट पाडून स्वतंत्र चूल मांडली. त्यानंतर शरद पवार पुन्हा अधिक सक्रिय झाले. लोकसभेत शरद पवारांना यश खेचून आणले. तर, विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला. या पराभवानंतर शरद पवार हे सक्रीय झाले आणि राज्यात दौरा सुरू केला. आता मात्र, शरद पवारांनी आपण निर्णय प्रक्रियेत नसल्याचे सांगत राजकीय निवृत्ती घेत असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. शरद पवार यांच्या राज्यसभा खासदारकीचा जवळपास दीड वर्षांचा कार्यकाळ बाकी आहे.