सोलापूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सोलापूरचं खास नातं आहे. त्यामुळेच आजही सोलापूरकरांनी बाबासाहेबांच्या खास आठवणी जतन करून ठेवल्या आहेत. अशीच एक आठवण दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूपच्या गावकऱ्यांनी जपली आहे. स्वतंत्र मजूर पक्षाचे उमेदवार जिवाप्पा ऐदाळे यांच्या प्रचासाठी 24 जानेवारी 1937 रोजी बाबासाहेब मंद्रूपमध्ये आले होते. येथील समाज मंदिरात त्यांची सभा झाली होती. याच सभेच्या ठिकाणचा खास दगड मंद्रुपकरांनी आजही जतन करून ठेवला आहे.
advertisement
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वतंत्र मजूर पक्षाकडून 1937 च्या निवडणुकांत जिवाप्पा ऐदाळे हे उमेदवार होते. त्यांच्या प्रचारासाठी बाबासाहेब 24 मार्च 1937 रोजी सोलापूर दौऱ्यावर आले होते. तेव्हा मंद्रूपमधील भीमनगरच्या नवीन समाज मंदिरात त्यांची सभा आयोजित केली होती. तेव्हा गावातील एका विहिरीजवळून एक दगड आणून समाजमंदिरासमोर ठेवला. त्या दगडावर पाय ठेवून डॉ .बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरात आले. त्यावेळी तेथे त्यांनी भाषण केले. तो दगड आजही समाज मंदिरात गावकऱ्यांनी जतन करून ठेवला आहे. याबाबत मंद्रूप येथील ग्रामस्थ सचिन फडतरे यांनी लोकल18 सोबत बोलताना माहिती दिली.
दोस्ती अशी भारी, तिघेही एकत्रच झाले न्यायाधीश, गावातल्या पोरांनी अख्ख्या पुण्याला दाखवलं! Video
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी, वळसंग या गावांना भेट देऊन तत्कालीन उमेदवार ऐदाळे यांना मते देण्यासाठी आवाहन केले होते. बाबासाहेबांची ही भेट धावती होती. परंतु, बाबासाहेब मंद्रूप येथे येणार असे समजल्यावर तेव्हाचे मंद्रूप येथील जुने पुढारी देशम्हेत्रे, गंगाप्पा रणखांबे,श्रीमंत देशमुख, श्री. पांढरे सर्व गावकरी गावात जमा झाले. त्यावेळेस बाबासाहेब मंद्रूप येथे सकाळी 7 वाजता आले होते. मंद्रूप येथील तसेच भीम नगर येथील सर्व गावकरी चौकात जमा झाले. शेकडो लोकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वागत केले.
म्हणून ठेवला दगड
मंद्रूप येथील चौकातून ते भीम नगर पर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकर पायी चालत आले. तेव्हा भीम नगर येथील समाज मंदिर नवीन होते. त्यावेळी समाजातील काही लोकांनी जवळ समाज मंदिराच्या पाठीमागे असलेल्या विहिरीजवळून एक मोठा दगड आणून समाज मंदिरासमोर ठेवला होता. तो दगड यासाठी ठेवण्यात आला होता की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या दगडावर पाय ठेवून आत यावे. म्हणून तो दगड ठेवण्यात आला होता. त्या दगडावर पाय ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समाज मंदिरात आले आणि त्या ठिकाणी 5 मिनिटाची सभा झाली, लोकांना मार्गदर्शन केले. स्वतंत्र मजूर पक्षाचे उमेदवार जीवाप्पा ऐदाळे यांना निवडून देण्याचे आवाहन केले. सभा संपल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मान सन्मान गावकऱ्यांनी केला.
आजही जतन केलाये दगड
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मंद्रूप या गावात आले होते याची आठवण म्हणून गावकऱ्यांनी आजपर्यंत तो दगड त्याच समाज मंदिरामध्ये ठेवला आहे. गावकऱ्यांनी आजही तो दगड पाहिला की डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या ठिकाणी येऊन गेल्याची जाणीव होते. तसेच ही वास्तू जतन करण्याचे काम येथील ग्रामस्थ करत आहेत.