नागपूर : बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यात कायद्या सुव्यवस्थेचा धाक उरला आहे की नाही, असे सवाल उपस्थितीत आहे. अशातच नागपूर शहरात गेल्या काही महिन्यांपासून संत्रानगरीमध्ये गुन्हेगारी वाढली आहे. मागील पाच दिवसांत ६ हत्याकांडाच्या घटना घडल्या आहेत. अशातच रविवारी आर्थिक वादातून 2 भावांचा खून झाल्याचीची घटना घडली आहे. या घटनेमुळे नागपूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तहसील पोलीस ठाणे हद्दीतील गांधीबाग परिसरात काली माता मंदिर समोर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. रवी राठोड, दीपक राठोड असं मृत भावांचं नाव आहे. तर बदनसिंग राठोड, अभिषेक आणि सोनू राठोड अशी आरोपींची नावं आहे. आरोपी बापलेक आहेत.. याशिवायही या प्रकरणी दोन आरोपी आहेत.
मृतक रवी आणि दीपक हे सख्खे भाऊ आहेत. दोघांचाही मागील काही दिवसांपासून बदनसिंग सोबत वाद सुरू होते. रात्री रवी राठोडवर काली माता मंदिरासमोर चाकूने जीवघेणा हल्ला करून त्याला संपवलं. भावावर चाकूने हल्ला झाल्याची माहिती मिळताच दीपक वाचवण्यासाठी धावून आला. पण आरोपी बापलेकांनी दीपकवरही चाकूने वार केले. यात भावाला वाचवण्यासाठी गेलेला दीपक गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी राठोड कुटुंबीयांनी तहसील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी बदनसिंगसह तिघांना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तहसील पोलीस करत आहे..
पाच दिवसांमध्ये ४ खून
दरम्यान, जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या ख्रिश्चन कब्रस्थान येथील चौकीदार रमेश शेंडे यांचा एका अज्ञात व्यक्तीने चाकूने भोसकून खून केला होता. . तर शुक्रवारी तिघांनी एकाला चाकूने भोसकून खून करून धंतोली परीसरात रस्त्यावर मृतदेह फेकून पळाल्याची घटना समोर आली होती. पोलिसांना अद्यापही मृताची ओळख पटवण्यात यश आले नाही. आणखी एक हत्येची घटना ही अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली होती. वडिल आणि मुलाचा खून झाला होता. या सोबतच दोन दिवसापूर्वी कळमनामध्ये वहिनीशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या मित्राचा खून केल्याची घटना समोर आली होती.
