मीरा-भाईंदर पालिका हद्दीतही हा प्रकल्प राबविला जाणार आहे. ठाणे शहरात वाहतुक कोडींची समस्या मोठ्याप्रमाणात आहे. घोडबंदर भागातील नागरिकांना या कोंडीचा सर्वाधिक फटका बसतो. या भागात नागरिककरण वाढले असताना रस्त्यांची रुंदी वाढलेली नाही. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर मोठा भार आलेला आहे. यामुळे या प्रकल्पाने प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्याबरोबर वेळेची बचतही होणार असल्याचा दावा सरनाईक यांनी केला.
advertisement
'ठामपा'च्या माध्यमातून ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील कामांचा आढावा सरनाईक यांनी घेतला. यावेळी 'पॉड टॅक्सी'चे सादरीकरण करण्यात आले. मुख्य मेट्रो आणि अंतर्गत मेट्रोचे शेवटचे स्टेशन हे घोडबंदर भागात येणार आहे; परंतु, तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी पॉड टॅक्सीचा पर्याय पुढे आला आहे. 'रोप-वे' प्रमाणे ही टॅक्सी चालवली जाणार आहे. पावसाळ्यात या भागात पाणी साचून होणाऱ्या कोंडीतून यामुळे सुटका होणार आहे. ही टॅक्सी हवेत तरंगत चालणार आहे. तिचा ताशी वेग 60 ते 70 किमी एवढा असणार आहे. यातून 16 प्रवासी एका वेळेस जाऊ शकतात.
एमएमआर क्षेत्रातही आता सर्वेक्षण केले जाणार आहे. ज्या ठिकाणी 'रोप-वे' शक्य असेल तेथे 'रोप-वे' आणि ज्या ठिकाणी 'पॉड टॅक्सी' शक्य असेल तेथे ती सेवा देण्यास प्राधान्य दिले जाईल. यासंदर्भातील निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीतही झाला आहे. त्यानुसार आता सर्वेक्षण करून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचेही ते म्हणाले.
या ठिकाणाहून धावणार विशेष 'पॉड टॅक्सी'
- भाईंदर पाडा ते विहंग हिल या एक किमीच्या 40 मीटर रस्त्याच्या वरच्या भागातून ही टॅक्सी धावणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर ही हवाई वाहतूक सुरू होणार असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली.
- मीरा-भाईंदर पालिका हद्दीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते जीपी येथील 60 मीटर रस्त्यावरही चालविली जाणार आहे.
- यासाठी सिमेंटचे गर्डर असून, याचे व्हील आणि ट्रॅक हे स्टीलचे असतील, अशी माहिती संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींनी दिली.