ठाणे महापालिका क्षेत्रात एमआयडीसी, मुंबई महापालिका, भातसा धरण, स्टेम प्राधिकरण आदी ठिकाणाहून पाणी पुरवठा होतो. ठाणे महापालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा आणि बारवी धरणात सध्याच्या घडीला मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे ठाणेकरांची चिंता सध्या मिटलेली आहे, असं म्हणायला हरकत नाही. बारवी धरणातून कल्याण-डोंबिवली पालिका, एमआयडीसी, 27 गावे, बदलापूर-अंबरनाथ औद्योगिक क्षेत्र, नवी मुंबई, ठाणे पालिका हद्दीतील कळवा, मुंब्रा, तळोजा औद्योगिक क्षेत्र, मीरा-भाईंदर शहरांना दैनंदिन पाणीपुरवठा केला जातो.
advertisement
मुंबईकरांना उष्णतेपासून मिळणार दिलासा, पुणे, नागपूर काय स्थिती? पाहा हवामान अंदाज
या धरणातून दररोज सुमारे 900 ते 1100 दशलक्ष लिटर पाणी वितरित केले जाते. दरवर्षी 15 जूनपर्यंत पुरेल इतक्या धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन करण्यात येते. त्यासाठी लघुपाटबंधारे विभागाकडून दरवर्षी जानेवारी महिन्यापासूनच पाणीकपात लागू करण्यात येते. यामुळे आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा बंद ठेवला जातो. पाऊस सुरू होईपर्यंत ही कपात लागू असते. परंतु, मागील वर्षी चांगला पाऊस पडल्याने धरणात पुरेसा पाणी साठा शिल्लक आहे. त्यामुळे सध्या तरी ठाणेकरांना पाणीकपातीच्या संकटातून दिलासा मिळाला आहे. तरीही पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे.
जुलैपर्यंत नियोजन
सध्या 585 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा ठाणे शहराला होतो. वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याचे नियोजन करताना प्रशासनाची कसरत होते. येत्या जुलैपर्यंत हा पाणीसाठा पुरावा, यादृष्टीने त्याचे नियोजन केले जात आहे. इतर वापरांसाठी कूपनलिका वापरात आणल्या जात आहे. महापालिकेच्या मालकीच्या इमारती, कार्यालये यासाठी पिण्याव्यतिरिक्त इतर कारणासाठी बोअरवेलच्या पाण्याचा वापर होत आहे.
असा होतो पाणीपुरवठा!
250 - महापालिकेच्या स्वतःच्या योजनेतून
115 - स्टेम प्राधिकरणाकडून
135 – एमआयडीसीकडून
85 - मुंबई महापालिकेकडून
(पाणीपुरवठा दशलक्ष लिटरमध्ये)
पर्यायी व्यवस्था
डोंगराळ परिसरात ज्या ठिकाणी पालिकेच्या यंत्रणेमधून कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत असतो अशा ठिकाणी पर्यायी व्यवस्था म्हणून नवीन कूपनलिका खोदण्यात येऊन हातपंप बसविले आहे. “ठाणे महापालिका हद्दीत मुबलक पाण्याच्या साठ्यामुळे सध्या तरी कुठेही पाणी कपात करण्यात आलेली नाही. शहरात सध्या पाणीपुरवठा सुरळीत असून पाणीकपातीबाबत कोणतेही निर्देश प्राप्त नाहीत,” असं पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता विनोद पवार यांनी सांगितलंय.






