दोन भावांच्या युतीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे विशेष लक्ष लागले आहे. मनसे-शिवसेना युती झाली तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपली अधिकृत भूमिका जाहीर करतील. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत सामील करण्याबाबत दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी प्राथमिक चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) युतीसंदर्भात सकारात्मक भूमिका घेत आहे, मात्र काँग्रेसने सावध पवित्रा घेतला आहे. काँग्रेसमधील राज्यस्तरीय नेते दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी चर्चा करूनच निर्णय घेणार असल्याची माहिती काँग्रेस नेत्यांनी दिली आहे. राज ठाकरे यांच्यासोबतची युती ही काँग्रेसकडे असलेल्या उत्तर भारतीय मतदारांवर परिणाम करणारी ठरू शकते. त्यामुळे हा मतदार भाजपकडे वळू नये यासाठी काँग्रेसकडूनही सावध पावले उचलण्यात येत आहेत.
advertisement
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, नाशिक आणि पुणे महापालिकेत मराठी मतदारसंघांमध्ये उद्धव-राज युती प्राधान्याने होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र स्थानिक पातळीवरील नेत्यांचे मत घेऊन काही ठिकाणी मनसेसोबत आणि काही ठिकाणी महाविकास आघाडीतील घटक पक्षांसोबत आघाडी करण्याचा पर्यायही खुला ठेवण्यात येईल. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास आगामी महापालिका निवडणुका आणि राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलू शकतात. त्याचमुळे आता विविध पर्यायांची चाचपणी महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून सुरू झाली आहे.
उद्धव यांचा मविआला गुड बाय की राज यांची एन्ट्री?
राज ठाकरे यांनी मागील काही काळात हिंदुत्व, परप्रांतीय, मराठीच्या मुद्यावर घेतलेल्या भूमिका या महाविकास आघाडी, इंडिया आघाडीच्या भूमिकांशी विसंगत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे आता राज ठाकरे यांच्यासोबत युती करताना उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीबाबत कोणती भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे हे महाविकास आघाडीचा भाग होणार का, याकडेही लक्ष लागले आहे. राज यांच्यासोबतच्या युतीला इंडिया आघाडी, मविआने विरोध दर्शवल्यास उद्धव ठाकरे आघाडीतून बाहेर पडू शकतात.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला वेगळं समीकरणं?
मुंबई, ठाणे, पुणे महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वेगळं समीकरण निर्माण होण्याची शक्यता आहे. या निवडणुका ठाकरे बंधू एकत्र लढवतील. तर, दुसरीकडे मविआतील घटक पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार गट हे आघाडीत निवडणूक लढवू शकतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील समीकरणे लक्षात घेता ठाकरे बंधू आणि मविआतील इतर पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.