राज्यातील प्रमुख महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य सरकारने या संदर्भात आदेशही काढले असून, निवडणुका जाहीर होण्याची शक्यता लवकरच आहे. मात्र, मनसे आणि ठाकरे गट यांच्यात युतीसंबंधी अजून कोणताही अधिकृत प्रस्ताव एकमेकांना देण्यात आला नसल्याचे म्हटले जात आहे. युतीबाबत नेते आणि पदाधिकारी पातळीवर चर्चा सकारात्मक असल्याचे संकेत आहेत. काही ठिकाणी मनोमिलनही झाल्याचे बोलले जाते.
advertisement
कधी होणार युतीचा निर्णय?
सूत्रांच्या माहितीनुसार, महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतरच युतीसंदर्भातील चर्चा आणि निर्णय पुढे जाणार आहेत. सध्या दोन्ही पक्ष आपल्या-आपल्या ताकदीचा आढावा घेत आहेत. विविध शहरांतील कार्यकर्त्यांचे मत, स्थानिक पातळीवरील गणितं आणि पक्षांची ताकद यावर लक्ष केंद्रीत करत आहेत. दोन्ही बाजूंकडून ‘सावध पवित्रा’ घेतला जात असल्याचं चित्र असून, युतीच्या संभाव्यतेचा पूर्ण निर्णय निवडणूकांच्या वेळेतच होणार, हे स्पष्ट होत आहे.
मतांची वजाबाकी की बेरीज?
मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आदी ठिकाणी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती झाल्यास मोठा बदल होऊ शकतो. दुसरीकडे दोन्ही पक्षांचा मतदार जवळपास समान आहे. त्यामुळे दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास मतांच्या वजाबाकीपेक्षा बेरीज अधिक भक्कम होईल. तर, दुसरीकडे दोन्ही पक्षांकडून निवडणूक घोषणेची प्रतिक्षा केली जात आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतरच दोन्ही पक्षात युतीबाबत अधिकृत चर्चा सुरू होईल असे सूत्रांनी सांगितले.