गुरुवारी सकाळी राज ठाकरे मुंबईतील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये पोहोचले. त्याच दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांचा ताफा पोहचला. त्यामुळे आज दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होणार असल्याची चर्चा सुरू झाली. या चर्चांवर काही वेळेत शिक्कामोर्तब झाले. एका बाजूला शिवसेना ठाकरे गटाकडून युतीसाठी सकारात्मक भूमिका घेतली जात असताना दुसरीकडे आज राज यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीचे राज्यात पडसाद उमटू लागले आहेत.
advertisement
अनिल परब यांनी काय म्हटले?
ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी म्हटले, मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांची आज भेट झाली. पण, ही भेट कशासाठी झाली, का झाली याचे तपशील अद्याप समोर आली नाही. आता, मुख्यमंत्र्यांना कोणी भेटले तर ती प्रत्येक भेट ही राजकीय भेट नसते. मुख्यमंत्र्यांना कोणीही भेटू शकतो. मात्र, आज ती भेट कशासाठी याचा तपशील समोर आल्याशिवाय भाष्य करणे योग्य नसल्याचे परब यांनी स्पष्ट केले.
अनिल परब यांनी म्हटले की, आम्ही शिवसेनेने भूमिका जाहीर केली आहे. आम्ही मनसेसोबत युतीचा हात पुढे केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील महाराष्ट्राच्या हिताच्या अनुषंगाने आपली भूमिका जाहीर केली आहे.
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा...
ठाकरे बंधू बीएमसी निवडणुकीआधी एकत्र येणार अशी चर्चा जोर धरू लागली आहे. दोघांनी तसं सूचक संकेत दिल्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील संभाव्य युतीबाबत पडद्यामागे हालचाली सुरू झाल्या आहेत. ठाकरे गटाचे नेते युतीबाबत सकारात्मक आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात परदेशात भेट झाली होती. ठाकरे बंधूंमध्ये ही गुप्त भेट माध्यमांना चकवा देत परदेशात झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. याआधी दोन्ही ठाकरे बंधू कौटुंबिक कार्यक्रमातही एकत्र दिसले होते.