उद्धव ठाकरे यांनी आज दिल्लीत प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, आज इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. मधल्या काळात इंडिया आघाडीच्या नेत्यांची व्हिडीओ कॉन्फरसिंगवर चर्चा झाली. आज पुन्हा एकदा बैठक होणार आहे. इंडिया आघाडीत आमची चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
राजसोबतच्या युतीची इंडिया आघाडीत चर्चा?
advertisement
आजच्या इंडिया आघाडीच्या बैठकीत राज ठाकरेंसोबतच्या युतीची चर्चा होणार का, असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला. त्यावर उद्धव यांनी भाष्य करताना म्हटले की, आम्ही दोघे भाऊ एकत्र आलो आहोत. या मुद्द्यावर दुसऱ्यांनी चर्चा करण्याची गरज नाही. आमच्यासाठी समर्थ आहोत असे त्यांनी स्पष्ट केले. इंडिया आघाडीत कोणत्याही अटी-शर्थी नसल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही दोघे समर्थ असून आता राज यांच्यासोबतच्या युतीवर मुंबईत संवाद करू, असे पत्रकारांना त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणूक निकालानंतर इंडिया आघाडीची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. आम आदमी पक्षाने इंडिया आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली होती. तर, तृणमूल काँग्रेसदेखील नाराज असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर आज इंडिया आघाडीची बैठक होत आहे.
सरकारचं परराष्ट्र धोरण अपयशी...
उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, ट्रम्प मोदींची थट्टा करत आहेत. खिल्ली उडवत आहे. आपण त्यांना एका अक्षराने उत्तर देत नाही. जाब विचारणं सोडा. देशाचं सरकार चालवतंय कोण? आपल्या देशाला पंतप्रधान, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री आणि गृहमंत्र्यांची गरज आहे, असे म्हटले होते. पहलगाम हल्ला झाला तेव्हा मोदी बिहारला गेले. हे सरकार अपयशी, असफल आणि असहाय आहे.यांना पररराष्ट्र नीती नाही. परराष्ट्र नीती अपयशी ठरली असल्याची टीका उद्धव यांनी केली.
