भ्रष्टाचारी आणि कलंकित मंत्र्यांना मंत्रिमंडळातून हटवा अशी मागणी करणारे आंदोलन शिवसेना पक्षाच्या वतीने राज्यभरात पार पडले. उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या आंदोलनात सहभाग नोंदवला. त्यानंतर शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन मतांच्या हेराफेरीचा आरोप, नवी दिल्लीतील इंडियाचे आंदोलन आदी विषयांवर मते मांडली. आमची लढाई ही निवडणूक आयोगाविरोधात आहे, मग सरकार का मध्ये पडतंय, हे आता उघड झाले आहे. अमुक मते आपल्या विरोधात आहेत, म्हणून मतांची छाटणी करायची, हा प्रकार बरोबर नाही याला सगळ्यांनी विरोध केला पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
advertisement
होय, निवडणूक काळात ते लोक मला भेटले होते
निवडणुका आल्यानंतर अशी लोक भेटत असतात, पण त्या गोष्टी आम्ही कधी गांभीर्याने घेतल्या नाहीत, आता असं वाटतंय की पुन्हा त्या लोकांना शोधलं पाहिजे. त्यावेळी आम्हाला अशा पद्धतीने जिंकायचे नव्हते. आम्हाला आमच्या कर्तृत्वावर विश्वास आहे. म्हणून आम्ही त्यांच्या नादी लागलो नाही. आता खरंच जे भेटून गेलेत ते कुठे सापडतायेत का हे पाहिले पाहिजे.ते जर सापडले तर पुन्हा त्यांच्याकडून ऐकून घेण्यात रस आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजपच्या नेत्याने EVM कसे हॅक होते, याचे प्रात्याक्षिक दाखवले होते
तसेच केवळ विधानसभा निवडणुकीतच नाही तर याआधीच्याही निवडणुकीत मला लोक भेटले होते. आमची भाजपशी युती होती तेव्हा ईव्हीएम कसे हॅक होते, याचे प्रात्याक्षिक भाजपच्या एका नेत्याने आम्हाला दाखवले होते, असा गौप्यस्फोटही ठाकरे यांनी केला. भाजपचे ते कोण नेते होते असे विचारले असता, आता ते नेते नाहीत, नुसतेच पक्षात आहेत, असे ठाकरे हसत हसत म्हणाले.
निवडणूक आयोगात नेतो असे सांगून खासदारांना पोलीस स्टेशनमध्ये नेले, हा तर दरोड्याचा प्रकार
आमची मागणी होती की बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या. परंतु याला निवडणूक आयोगाने नकार दिला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आता तर व्हीव्हीपॅट देखील काढले आहे. आम्ही मतचोरीचा आरोप करीत असताना आणि निवडणूक आयोगाकडून काही माहिती मागितलेली असताना वगळलेली नावे आम्ही देणार नाही असे निवडणूक आयुक्तांनी सांगितले. राष्ट्रपतींपेक्षा निवडणूक आयुक्त मोठे झालेत का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.
मतोचोरीचा विषय मोदींनी राहुल गांधींकडून समजून घ्यावा
दिल्लीतल्या आंदोलनावेळी विरोधी खासदारांना सांगण्यात आले की निवडणूक आयोगात नेतो आणि पोलिसांनी गाडीत बसवून त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेले, हा दरोड्याचा प्रकार आहे, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच राहुल गांधी यांचे मतचोरीसंदर्भातील प्रेझेटेंशन पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच सत्तेतील सगळ्या मंत्र्यांनी आणि सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी समजून घ्यावे. देशात दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून कसा होतो, हे त्यांना समजेल , असेही उद्धव ठाकरे म्हणाले.