विरारच्या फुलपाडा परिसरातील खाडग्या तलावात झालेल्या दुर्घटनेत 11 वर्षीय सार्थक मोरे या चिमुकल्याचा जीव गमवावा लागला. खेळण्यासाठी तलावाजवळ गेलेला सार्थक पाय घसरून पाण्यात पडला. पण महापालिकेकडून तलावाजवळ कुठलाही सुरक्षारक्षक किंवा जीवरक्षक नसल्याने त्या मुलाला वेळेत मदत मिळू शकली नाही आणि तलावात बुडून त्याचा मृत्यू झाला आहे.
विशेष म्हणजे या तलावाचे काम काही दिवसांपासून सुरू आहे. ठेकेदार आशुतोष झा यांच्या मार्फत नवीन जाळी बसविण्याचे काम सुरू होते. परंतु प्रत्यक्षात जाळी अपूर्ण, परिसरात कुठेही बॅरिकेड नाही,सूचना फलक नाहीत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एकही सुरक्षा रक्षक नेमलेला नव्हता – अशी धक्कादायक परिस्थिती स्थानिकांनी उघडकीस आणली आहे. त्यामुळे महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे एका निष्पाप मुलाच्या मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे.
advertisement
तसेच घटनास्थळी नागरिकांचा संताप उसळला असून, “पालिका आणि ठेकेदार यांच्या निष्काळजीपणामुळेच हा मृत्यू घडला आहे” असा सरळ आरोप रहिवाशांनी केला आहे. तलावाजवळ कोणताही निगराणी ताफा नसल्याने मुलांना निर्बंधाशिवाय परिसरात वावरता येत असल्याचे लोकांनी स्पष्ट सांगितले.
गेल्या काही महिन्यांत वसई-विरार भागातील पालिका नियंत्रणाखालील तलावांमध्ये सातत्याने बुडून मृत्यूंच्या घटना घडत आहेत.तरीही एकाही ठिकाणी ठोस सुरक्षा उपाययोजना न करता महापालिका केवळ कागदोपत्री जबाबदारी निभावत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.निष्पाप जीव जात असताना प्रशासन डोळेझाक करत असल्याची भावना जनतेत तीव्र झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करत पुढील तपास सुरू केला आहे.






