मला दोन तारखेपर्यंत युती टिकवायचीये, भाजप प्रदेशाध्यक्षांकडून राज्यात मोठ्या भूकंपाचे संकेत!
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत फोडाफोडीच्या मुद्द्यावरून राजकारण तापलंय. त्यातही भाजप आणि शिंदे सेनेतल्या संघर्षामुळे युतीत सगळे काही आलबेल नसल्याचे स्पष्ट आहे.
मुंबई : नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी राज्यात 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. मात्र ही तारीख आणखी एका कारणामुळे चर्चेत आली. दोन डिसेंबरपर्यंत आम्हाला महायुती टिकवायची आहे, असे सूचक विधान भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केल्यामुळे राज्यात खळबळ उडालीय. त्यांच्या वक्तव्यातून राज्यात मोठ्या भूकंपाचे संकेत मिळत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत फोडाफोडीच्या मुद्द्यावरून राजकारण तापलंय. त्यातही भाजप आणि शिंदे सेनेतल्या संघर्षामुळे युतीत सगळे काही आलबेल नसल्याचे स्पष्ट आहे. याच पार्श्वभूमीवर रविंद्र चव्हाणांच्या विधानाचे विविध अर्थ काढले जाऊ लागले आहे.
२ डिसेंबर नंतर राज्यात काय होणार?
श्रीकांत शिंदे यांनी यासंदर्भात दिलेल्या प्रतिक्रियेमुळे चर्चांना आणखी उधाण आलं. त्यात कोकणात भाजपकडून पैसे वाटप केले जात असल्याच्या निलेश राणेंच्या आरोपांमुळे या संघर्षाला आणखी धार आल्याचे बोलले जात असतानाच चव्हाणांच्या विधानामुळे 2 डिसेंबरनंतर महायुतीत नेमकं काय होणार यावरून अनेक तर्क लढवले जात आहे.
advertisement
निवडणुकीनंतर युती तुटणार?
मागील काही दिवसांपूर्वी मुंबई दौऱ्यावर आलेले अमित शाह यांनी भाजपाला राज्यात कुबड्यांची गरज नसून स्वबळावर निवडणुका लढविण्यास सक्षम असल्याचे म्हटले होते. शाह यांच्या विधानाचा योग्य अर्थ घेत राज्यातील भाजपाच्या नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे अधिक बारकाईने आणि जातीने लक्ष घालून गुलाल आपल्याच अंगाला लागेल याची आक्रमकपणे आखणी केली आहे. निवडणुका सरल्यानंतर भाजप आणि सेनेतल्या संघर्षाचा दुसरा अंक सुरू होऊन त्याचा परिपाक युती तुटण्यात होणार का? अशी चर्चा रविंद्र चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर सुरू आहे.
advertisement
अमित शाह यांच्याकडे रविंद्र चव्हाण यांची तक्रार? एकनाथ शिंदे म्हणाले...
दरम्यान 'न्यूज 18 लोकमत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रविंद्र चव्हाणांबाबत मोठं विधान केलंय. रविंद्र चव्हाण प्रकरणी आपण मुख्यमंत्र्यांशी बोललो असून आम्ही राज्यातील नेते हे प्रकरण हाताळण्यास सक्षम आहोत. हे प्रकरण अमित शाहांकडे नेण्याचा प्रश्नच नाही असं उत्तर शिंदेंनी दिलंय.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 27, 2025 8:22 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मला दोन तारखेपर्यंत युती टिकवायचीये, भाजप प्रदेशाध्यक्षांकडून राज्यात मोठ्या भूकंपाचे संकेत!


