मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. मुंबई महापालिकेसह पुणे, ठाणे, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड अशा राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या महापालिका निवडणुकीची प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. या प्रभाग रचनेच्या घोषणेनंतर सत्ताधाऱ्यांना अनुकूल अशी प्रभाग रचना करण्यात आल्याचा आरोप होत आहे. तर, दुसरीकडे या प्रभाग रचनांवरून सत्ताधारी महायुतीमध्येच धुसफूस सुरू झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. महायुतीमध्ये वाद कुठपर्यंत ताणला जातो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याचे कारभारी असलेले एकनाथ शिंदे यांनी आपलं वजन वापरत बहुसदस्य प्रभाग रचना शिवसेनेला अनुकूल केल्याचे म्हटले जात आहे.
advertisement
रखडलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अखेर प्रभाग रचनेचा मसुदा जाहीर झाला. मात्र, यामुळे सत्ताधारी महायुतीत कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. मुंबईत मात्र मोठे बदल झालेले नाहीत. मुंबईत 227 प्रभाग कायम ठेवण्यात आले आहेत. केवळ कोस्टल रोड, मेट्रोमुळे काही प्रभागांमध्ये किरकोळ फेरफार करण्यात आले आहेत. महाविकास आघाडीच्या काळात 236 प्रभागांची आखणी झाली होती, परंतु महायुती सत्तेत आल्यानंतर पुन्हा जुनी रचना लागू करण्यात आली. या उलट आता, ठाणे, नवी मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्ये प्रभाग रचनेवरून वाद पेटले आहेत.
ठाण्यातील महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्यासाठी भाजपने गणेश नाईक यांना जबाबदारी दिली आहे. मात्र, नाईकांची त्यांचे होम ग्राउंड असलेल्या नवी मुंबईतच कोंडी झाल्याचे म्हटले जात आहे. नवी मुंबईत शिंदे समर्थकांनी शिवसेनेला अनुकूल अशी रचना केली असल्याचा आरोप वनमंत्री गणेश नाईक यांनी केला आहे. आता या मुद्यावर त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची घोषणा केली आहे. पुण्यात अजित पवार गटाने शिंदे गट आणि भाजप दोघांवरही टीका करत नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्ये थेट भाजप आणि अजित पवार गटातच प्रामुख्याने लढत होणार असल्याचा अंदाज आहे. मात्र, निधी वाटपावरून शिवसेनेच्या मंत्र्यांची कोंडी करणाऱ्या अजित पवारांच्या अडचणी शिंदे वाढवू शकतात, अशीही चर्चा रंगली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका अजित पवारांसाठी महत्त्वाची आहे. तर, पुण्यातही भाजपला अनुकूल प्रभाग रचना झाली असल्याचा सूर अजित पवार गटातून उमटत आहे. अनेक नेत्यांचे प्रभाग फोडण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
महायुतीच्या अंतर्गतच निर्माण झालेल्या या वादामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. प्रभाग रचनेवरून सुरू झालेला वाद राजकारण आणखीच तापवणार असल्याची शक्यता आहे.