मुंबई: ऐन संध्याकाळच्या वेळी पुन्हा एकदा मध्य रेल्वेवरील वाहतूक ठप्प झाली आहे. मध्य रेल्वे मार्गावरील पळसदरी स्टेशनजवळ लोकलने 2 बैलांना उडवलं. या घटनेमुळे खोपोली- मुंबई लोकल सेवा ठप्प झाली आहे. या घटनेमुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. खोपोलीहून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलचं वेळापत्रक कोलमडलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या केळवली आणि पळसदरी या स्टेशन दरम्यान ही घटना घडली आहे. खोपोलीहून ६ वाजता सुटणारी खोपोली मुंबई या लोकलने २ बैलांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, धडक दिल्यानंतर दोन्ही बैलांचा मृत्यू झाला. तर एक बैल ट्रेनच्या चाकात अडकला. त्यामुळे लोकल पुढे सरकत नसल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
advertisement
या स्टेशन दरम्यान अप आणि डाउनसाठी एकच ट्रॅक असल्याने मुंबईहून खोपोली आणि खोपोलीहून मुंबई ही वाहतूक ठप्प झाली आहे. बैल चाकात अडकल्याने हा बैल काढण्यासाठी खोपोली हून हेल्प फाउंडेशनची टीम घटनास्थळी दाखल होत आहे. अजून तरी एक तास ही वाहतूक ठप्प राहणार आहे.कामावरून घरी पोहणाऱ्या कामगार वर्गाचे मात्र हाल झाले आहेत.
लोकलच्या धडकेत ३ जणांचा मृत्यू
दरम्यान, मागील आठवड्यात मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर मोटरमन आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी अचानक आंदोलन पुकारलं होतं. त्यामुळे ऐन संध्याकाळी मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. काही तासांच्या या आंदोलनामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. याच दरम्यान सँडहर्स्ट रोडवर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. याच दरम्यान स्टेशनवर धावत्या लोकलने ४ प्रवाशांना धडक दिली होती. या अपघातात ३ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. यामध्ये एका महिलेचा समावेश होता. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची लाट होती.
