‘म्हाडा’च्या वांद्रे येथील मुख्यालयात नागरिक सुविधा केंद्र व अभ्यागत व्यवस्थापन प्रणालीचे उद्घाटन संजीव जयस्वाल यांनी सोमवारी केले. यावेळी त्यांनी ‘म्हाडा’च्या प्रकल्पांबाबत माहिती दिली. “'म्हाडा'कडून मुंबई शहर आणि उपनगरात पुनर्विकासासह समूह पुनर्विकासाचे प्रकल्प राबविले जात आहेत. सेस म्हणजे उपकर प्राप्त इमारतींचा पुनर्विकास करतानाच म्हाडाच्या वसाहतीच्या पुनर्विकासाचे काम देखील हाती घेण्यात आले आहे,” असे त्यांनी सांगितले.
advertisement
इथं पुनर्विकास प्रकल्प
वरळी येथील आदर्शनगर, चुनाभट्टी येथील गुरू तेगबहादूरनगर, मोतीलालनगर, जोगेश्वरीमधील 'पीएमजीपी' कॉलनीसह म्हाडाच्या जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास केला जाणार आहे. त्या माध्यमातून मुंबईकर रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.
Mumbai Weather: एप्रिलअखेर मुंबईवर दुहेरी संकट, दुपारी घरातच थांबा, हवामान विभागाने दिला अलर्ट
घरांचा साठा उपलब्ध होणार
“पुनर्विकासाच्या माध्यमांतून ‘म्हाडा’ला घरांचा साठा उपलब्ध होणार आहे. म्हाडाच्या घरांच्या किमती खासगी बिल्डरांच्या तुलनेत कमी आहेत. घरांच्या किमती परवडणाऱ्या ठेवण्यासाठी उत्पन्न गटाचे निकष बदल आणि किमतीबाबतही अभ्यास केला जात आहे. मुळात मुंबईत घरांच्या किमती वाढत असल्याने सर्वसामान्यांना घर घेणे शक्य नाही. तरीही सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून म्हाडा काम करत आहे,” असेही जयस्वाल यांनी सांगितले.
15 मेदरम्यान चाव्या देणार
वरळीमधील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे काम वेगाने सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील रहिवाशांना घरांचा ताबा देण्यासाठी लॉटरी देखील काढण्यात आली. मात्र, ओसी आणि इतर बाबींमुळे अद्याप रहिवाशांना घरांचा ताबा देता आला नाही. महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या सोबत याप्रकरणी बोलणे झाले असून त्यानुसार कार्यवाही सुरू आहे. येत्या 15 मेदरम्यान पहिल्या टप्प्यातील रहिवाशांना घरांच्या चाव्या मिळतील, असे देखील संजीव जयस्वाल यांनी सांगितले.