मुंबईतील कुर्ला, सांताक्रूझ, अंधेरी, सायन, माटुंगा, घाटकोपर, धारावी यांसारख्या भागांमध्ये पाणी गळ्यापर्यंत भरलं होतं. शहराच्या सगळ्या प्रमुख वाहतूक मार्गांवर पूरस्थिती निर्माण झाली होती. रेल्वे सेवा पूर्ण ठप्प झाली, बस सेवा बंद पडली, रस्त्यांवर वाहनांच्या रांगा तासनतास उभ्या होत्या.
Nashik News: VIP दर्शन बंद, पहाटेपासूनच मंदिर खुले, श्रावण मासनिमित्त नाशिकची प्रसिद्ध मंदिरे सज्ज
advertisement
या दिवशी सुमारे 1000 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. 37000 रिक्षा, 4000 टॅक्सी आणि 900 बेस्ट बसेस या पावसात जलमय झाल्या. हजारो घरे उद्ध्वस्त झाली आणि कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. संपूर्ण शहर थांबून गेलं आणि नागरिकांच्या मनात कायमची एक भीती निर्माण झाली.
प्रत्यक्षदर्शींच्या आठवणी – 20 वर्षांनंतरही मन हेलावणारे अनुभव
20 वर्षांनंतरही त्या दिवसाच्या आठवणी मुंबईकरांच्या मनात जिवंत आहेत. त्या दिवसाचे साक्षीदार असलेल्या काही नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
बोरिवलीमधील मंजिरी घाणेकर, वय 32 वर्ष, त्या वेळी केवळ दहा वर्षांच्या होत्या. त्या सांगतात, बोरिवलीतील आमच्या चाळीत पाणी घरात शिरलं होतं. शेजाऱ्यांची महत्त्वाची कागदपत्रं वाहून गेली. अजूनही तो दिवस आठवला की अंगावर शहारा येतो.
अजय राघव, जे 2005 मध्ये दहा-बारा वर्षांचे होते आणि कोकणहून पहिल्यांदाच मुंबईत आले होते. माझ्या आयुष्यात मी कधीच असं काही पाहिलं नव्हतं. कोकणात पाऊस पाहिला होता पण मुंबईचा 26 जुलैचा पाऊस भयावह होता, असं ते म्हणतात.
प्रकाश माने, तेव्हा कॉलेजमध्ये होते. ते सांगतात, माझं कॉलेज सुटलं तेव्हा सगळीकडे पाणी साचलेलं होतं, गळ्यापर्यंत पाणी होतं. मी धारावीत राहत होतो. तिथं जवळपास 20 दिवस पाणी साचलेलं होतं. वाहतूक, रेल्वे, बाजार – सगळं ठप्प होतं.
20 वर्षांपूर्वी या दिवसांत पावसाने धुमाकूळ घातला होता. सध्याही राज्यात अशीच परिस्थिती असून गेली तीन ते चार दिवस मुंबईसह कोकणकिनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. आजही पावसाने सकाळपासूनच मुंबईत जोरदार हजेरी लावली असून अनेक भागात पाणी साचलं आहे. 26 जुलैला मुंबईत जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.