ऐन गर्दीच्या वेळी धावत्या ट्रेनमधून प्रवासी ट्रॅकवर पडल्याची माहिती मिळाली आहे. दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान ट्रेनमधून पडून 6 प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या अपघातानंतर रेल्वे रुळांवर रक्ताचा सडा दिसून आला. तर, काही मृत प्रवाशांचे मृतदेह प्लॅटफॉर्मवर ठेवण्यात आल्याने प्लॅटफॉर्मवरही रक्ताने माखले असल्याचे अस्वस्थ करणारे चित्र दिसून आले.आज सकाळी 10 ते 12 प्रवासी ट्रेनमधून पडल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. दिवा स्थानकातही दोन प्रवासी पडले असल्याची माहिती समोर आली आहे. हे दोन्ही प्रवासी महिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या अपघातासाठी रेल्वे प्रशासना जबाबदार असल्याचे समोर आले आहे.
advertisement
जखमी प्रवाशाने काय सांगितलं?
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील लीला यांनी पत्रकार परिषदेत त्यांनी अपघाताबाबत माहिती दिली. हा अपघात कसा झाला, याची माहिती या जखमी प्रवाशाने रेल्वे अधिकाऱ्यांना दिली आहे. जखमी प्रवासी हा लोकलच्या फुटबोर्डवरुन (दरवाजावरून) प्रवास करत होता. तो लटकून ट्रॅवल करत होता. त्याची बॅग पाठीमागे अडकली होती. त्याच दरम्यान विरुद्ध दिशेने दुसरी लोकल आली आणि बॅग अडकल्याने, धक्का बसल्याने तो खाली पडला असल्याची प्राथमिक माहिती त्याने दिली. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दोन मार्गिकेतील रुळांमध्ये साधारणपणे दीड ते दोन मीटरचं अंतर असते. मात्र, प्रवासी लटकून प्रवास करत असल्याने आणि त्यात बॅग असल्याने हे अंतर फार कमी होते. आजच्या घटनेत आता जे प्रवासी प्रवास करत होते त्यांच्या मागे त्यांच्या बँगा लटकलेल्या होत्या, अशी माहिती आहे. जखमी प्रवाशाने देखील सांगितलं की त्याची बॅग मागे लटकत होती.
दोन्ही लोकल एकाच वेळी आल्या...
एक लोकल सीएसएमटीच्या दिशेने जाणारी आणि एक कल्याण-कसाराच्या दिशेने जाणारी लोकल एकाच वेळी आल्या. त्यावेळी दिवा-मुंब्रामधील एका वळणावर दोन्ही लोकलमधील प्रवासी हे एकमेकांना धडकले आणि रेल्वे रुळावर पडले, असल्याची घटना घडली. मुंबई लोकल ट्रेनच्या इतिहासातील हा पहिलाच असा विचित्र अपघात असल्याची माहिती समोर आली आहे.
