सीईआयआरमुळे उघडकीस आली मोठी साखळी
गेल्या काही महिन्यांत चोरीला गेलेल्या हजारो मोबाइलचा माग काढण्यात मुंबई पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. दूरसंचार विभागाच्या सीईआयआर (सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर) पोर्टलमुळे मुंबईत हरवलेले मोबाइल उत्तर प्रदेश, झारखंडसह उत्तर भारतातील विविध गावांमध्ये वापरले जात असल्याचं स्पष्ट झालं.
पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांचं यश, ऑनलाईन फसवणुकीत गमावलेले 24 कोटी केले परत, काय घडलं?
advertisement
‘पॉप-अप अलर्ट’ने दिला धक्का
मुंबई पोलिसांनी मागील तीन महिन्यांत हरवलेल्या व चोरीला गेलेल्या मोबाइलच्या तक्रारी सीईआयआर पोर्टलवर नोंदवल्या होत्या. काही दिवसांपूर्वी अचानक २५ हजारांहून अधिक मोबाइल पुन्हा सुरू झाल्याचे अलर्ट मिळाले. या अलर्टसोबतच नव्या सिमकार्डधारकांची माहिती—नाव, पत्ता आणि मोबाइल क्रमांक उपलब्ध झाल्याने चोरीच्या मोबाइलचा ठावठिकाणा थेट पोलिसांच्या हाती आला.
नवीन सिम, लगेच सूचना
चोरीच्या मोबाइलमध्ये नवीन सिमकार्ड टाकताच पोर्टलवर सूचना मिळू लागली. त्यानंतर पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. विशेष पथकांनी उत्तर प्रदेशातील प्रतापगडसारख्या भागांत जाऊन कारवाई सुरू केली.
1 ते 3 हजारांत आयफोन!
तपासादरम्यान आणखी धक्कादायक वास्तव समोर आलं. आयफोनसह महागडे अँड्रॉइड फोन अवघ्या 1 हजार ते 3 हजार रुपयांत विकले जात होते. स्वस्त दराच्या आमिषाने अनेक ग्रामीण मजूर व सामान्य नागरिकांनी हे फोन खरेदी केले. मात्र, हे मोबाइल चोरीचे आहेत याची त्यांना कल्पनाही नव्हती.
हजारो मोबाइल हस्तगत
आतापर्यंत ५ हजारांहून अधिक मोबाइल हस्तगत करण्यात आले असून ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या कारवाईमुळे मोबाइल चोरी करणाऱ्या टोळ्यांना मोठा धक्का बसला आहे.
मोबाइल हरवला किंवा चोरीला गेला तर काय करावे?
सीईआयआर पोर्टलला भेट द्या: www.ceir.gov.in
Block/Stolen Mobile हा पर्याय निवडा.
आयएमईआय नंबर, मोबाइल क्रमांक व मालकाची माहिती भरा.
खरेदीची पावती आणि पोलिस तक्रार अपलोड करा.
मोबाइल चोरी ही केवळ वैयक्तिक नुकसानाची बाब राहिलेली नसून ती एक मोठी साखळी बनली आहे. मात्र, तंत्रज्ञानाच्या मदतीने आता या चोरट्यांची पावलं रोखली जात असल्याचं या कारवाईतून स्पष्ट झालं आहे.






