भांडुप येथे सुमारे 46 वर्षांपूर्वी उभारलेला 1910 दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा जुना जलशुद्धीकरण प्रकल्प आता संरचनात्मकदृष्ट्या कमकुवत झाला आहे. त्याचे आयुर्मान संपुष्टात येत असल्याने त्याच्या जागी अधिक क्षमतेचा, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवीन प्रकल्प उभारण्यात येत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईच्या पाणीपुरवठा व्यवस्थेत मोठी सुधारणा होणार असून नागरिकांना अधिक दर्जेदार आणि सुरक्षित पाणी उपलब्ध होणार आहे.
advertisement
Mumbai Water: मुंबईकर पाण्याचं टेन्शन सोडा, ‘गेमचेंजर’ प्रकल्पाचा मार्ग मोकळा, कामाला गती!
महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी शुक्रवारी प्रकल्पस्थळी भेट देऊन कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रकल्पाच्या कामांना गती देण्याचे निर्देश दिले. भविष्यातील वाढती लोकसंख्या, औद्योगिक विस्तार आणि वेगाने होणारे नागरीकरण लक्षात घेता पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. ही गरज भागवणे आणि जुन्या प्रकल्पाची जागा घेणे, हा या नव्या प्रकल्पाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
या पाहणीदरम्यान विशेष अभियांत्रिकी विभागाचे उपायुक्त पुरुषोत्तम माळवदे, पाणीपुरवठा प्रकल्पाचे प्रमुख अभियंता महेंद्र उबाळे तसेच इतर अभियंते व अधिकारी उपस्थित होते. यावेळी आयुक्तांनी पाणीपुरवठा वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर दिला.
सध्या मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी तानसा–वैतरणा प्रणाली आणि भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रांचा वापर केला जातो. विविध जलाशयांमधील पाणी गुरुत्वाकर्षणाच्या साहाय्याने भांडुप संकुलात आणले जाते आणि तेथून शुद्धीकरण करून शहर व पश्चिम उपनगरांना पुरवले जाते. दररोज सुमारे 2,600 दशलक्ष लिटर पाणी मुंबईकरांपर्यंत पोहोचवले जाते. भांडुप संकुलाची क्षमता वाढवण्यासाठी हा नवीन प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.






