मिळालेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी महंत राम मिलन दास यांनी आपली अयोध्येतील रामघाट परिसरातील जमीन विकली होती. या जमिनीसाठी त्यांना आठ लाख मिळाले होते. तसेच त्यांच्या बँक खात्यात आधीपासूनच दीड कोटी रुपये होते. कोतवाली पोलिस स्टेशनचे प्रभारी मनोज शर्मा यांनी सांगितले की, त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. जमिनीच्या विक्रीतून मिळालेला पैसा हा त्यांच्या मृत्यूमागचं कारण आहे का? हे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
advertisement
या प्रकरणी पोलिसांनी महंतांची मोलकरणी शकुंतला (40) हिला ताब्यात घेतले आहे. शकुंतला 13 वर्षांपासून महंतांची सेवा करत होती आणि त्यापूर्वी तिच्या आईने आश्रमात सेवा बजावली होती. महंत राम मिलन दास (48) हे 15 वर्षांपासून रावत मंदिराचे महंत होते.
नेमकी घटना काय घडली?
राम मिलन दास हे कुशीनगरमधील बाड हरवा गावचे रहिवासी होते. ते १५ वर्षांपासून रावत मंदिराचे महंत होते. त्यांचे गुरू राम मंदिर चळवळीतील प्रमुख संतांपैकी एक होते. ते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही जवळचे होते. अयोध्या दौऱ्यादरम्यान, मुख्यमंत्री योगी यांनी त्यांना भेटण्यासाठी अनेकदा रावत मंदिराला भेट दिली होती.
शिष्यांनी सांगितले की, "महंत राम मिलन दास रामायणी यांनी शनिवारी संध्याकाळी ७ वाजता जेवण केले. दासी शकुंतला यांनी त्यांना जेवण दिलं होतं. त्यानंतर काही वेळातच शकुंतला ओरडत बाहेर आली. आवाज ऐकून त्यांचे सर्व शिष्य घटनास्थळी धावले. त्यावेळी महंतांच्या तोंडातून फेस येत होता. त्यांना तातडीने श्री राम रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली, पण तोपर्यंत त्यांचा श्वास थांबला होता.
मंदिरातील शिष्यांनी सांगितले की त्यांनी त्यांच्या मृत्यूच्या एक दिवस आधी दिगंबर आखाड्यातील संतांसोबत जेवण केले होते. त्यावेळी ते पूर्णपणे निरोगी होते. महंत राम मिलन दास यांच्या मृत्यूची माहिती मिळताच डीएम-एसएसपी रुग्णालयात पोहोचले. त्यांनी भक्तांकडून सर्व माहिती घेतली असून तपासाला सुरुवात केली आहे. दिगंबर आखाड्याचे महंत राम लखन दास, महंत वैदेही वल्लभ शरण, वामन मंदिराचे प्रमुख आणि राधा मोहन कुंजचे महंत सुदर्शन दास यांनी महंत राम मिलन दास यांचा मृत्यू कसा झाला? हे स्पष्ट झाले पाहिजे, अशी मागणी केली. तसेच त्यांनी शवविच्छेदनाची देखील मागणी केली.