पहिल्या टप्प्याचे हाती आलेल्या अंदाजानुसार नितीश कुमार यांच्या जनता दल (युनायटेड) चा करिश्मा पाहायला मिळाला आहे. जेडीयूला या टप्प्यात 35 ते 45 जागा मिळू शकतात. 2020 मध्ये या भागात त्यांना फक्त 23 जागा मिळाल्या होत्या. 2020 मध्ये एलजेपीने (रामविलास पासवान गट) उमेदवार उभे करून जेडीयूला मोठा धक्का दिला होता. मात्र, या वेळी एलजेपीच्या भूमिकेमुळे गोंधळ नसल्याने एनडीएचे मत एकत्र आले असावेत असा अंदाज व्यक्त केला जातो.
advertisement
जेडीयूला अतिदुर्बल घटक (EBC), कुशल कामगार, लघुउद्योग व्यापारी वर्ग यांचं मोठं समर्थन मिळाल्याचं दिसतं आहे.तर भाजपने 48 जागांवर उमेदवार उभे केले असून त्यांना 20 ते 30 जागा मिळण्याचा अंदाज आहे. शहरी मतदार, सवर्ण समाज, आणि महिला मतदारांमध्ये भाजपचं मजबूत समर्थन कायम आहे.
आरजेडीला फटका, महागठबंधन पिछाडीवर
तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला (RJD) या टप्प्यात फटका बसलेला दिसतो.2020 मध्ये 121 पैकी 42 जागा जिंकणाऱ्या आरजेडीला यंदा 25 ते 35 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे. रोजगाराच्या आश्वासनामुळे तरुण मतदार आणि ओबीसी मतदार आरजेडीकडे झुकले असले तरी, ग्रामीण भागात जेडीयूने गमावलेली मते परत मिळवली, असं दिसतं आहे.
काँग्रेसने या टप्प्यात 24 जागांवर उमेदवार दिले असून त्यांना 5 ते 10 जागा मिळू शकतात. बहुतांश काँग्रेसच्या मजबूत जागा दुसऱ्या टप्प्यात आहेत. डाव्या पक्षांची (CPI-ML, CPI, CPM) मात्र स्थिर किंवा थोडी वाढ होण्याची शक्यता असून त्यांना 10 ते 15 जागा मिळतील, असा अंदाज आहे.
जनसुराज्य पक्षाचा करिश्मा नाही चालला
प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाने (JSP) पहिल्या टप्प्यात तब्बल 118 जागांवर उमेदवार उभे केले, परंतु एकाही जागेवर प्रभाव पडलेला नाही. नवीन पक्ष म्हणून मिळालेलं लक्ष मतदानात रूपांतरित करण्यात JSPला यश आलेलं दिसत नाही.
मतदारांचा कल – वेगवेगळे आधारगट
पहिल्या टप्प्यातील आकडेवारीनुसार बिहारमध्ये मतदारांचा कल सामाजिक आणि आर्थिक स्तरांनुसार स्पष्ट विभागलेला दिसतो:
शहरी मतदार, उच्चशिक्षित वर्ग: भाजप, काँग्रेस
ग्रामीण मतदार, ईबीसी समुदाय: जेडीयू
ओबीसी आणि तरुण मतदार: आरजेडी
शेतमजूर, गैर-कृषी कामगार: आरजेडी, काँग्रेस
व्यवसायिक, कुशल कामगार: जेडीयू
महिला मतदार: भाजपकडे झुकलेले
जमीनधारक वर्ग: भाजप समर्थक
