हवामानाची परिस्थिती
समुद्रसपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीवर विदर्भ परिसरात चक्राकार वारे सक्रिय आहेत. बंगालच्या उपसागरापासून राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगडमार्गे केरळपर्यंत कमी दाबाचा पट्टा पसरलेला आहे. त्यामुळे मॉन्सून पुन्हा सक्रीय झाला असून, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली आहे.
मराठवाड्यात भीषण परिस्थिती
नांदेड, लातूर, बीड, परभणी, धाराशिव, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे हाहाकार माजला आहे. नांदेड जिल्ह्यातील काही भागांत 280 मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली. सलग मुसळधार पावसामुळे शेत तळी झाले असून सोयाबीन, उडीद, मूग यांसह भाजीपाला आणि कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
advertisement
नांदेड जिल्ह्यात तीन तलाव फुटल्यामुळे शेती पाण्याखाली गेली असून आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर एक जण बेपत्ता आहे. लातूर जिल्ह्यात पशुधनाचे नुकसान झाले. गोठ्यांत पाणी शिरल्याने गायी-म्हशी, कोंबड्या मृत झाल्या. वीज पडून जनावरं दगावल्याच्या घटना घडल्या आहेत.
बचावकार्य युद्धपातळीवर
नांदेड जिल्ह्यातील पूरस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी SDRF, CRPF, मनपा आणि स्थानिक प्रशासनाची पथके युद्धपातळीवर कार्यरत आहेत. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नागरिकांना अति-आवश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
पावसाचा अंदाज
आज (ता. 30) पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा आहे. तर नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, जालना, परभणी जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?
अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्ग सर्वाधिक प्रभावित झाला आहे. हवामान विभागाकडून काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत जसे की,
पाणी उपसा : शेतातील तुंबलेले पाणी त्वरित बाहेर काढावे, जेणेकरून पिकांची मुळे कुजणार नाहीत.
खत व्यवस्थापन : पावसामुळे मातीतील पोषकतत्व धुऊन गेलेले असू शकतात. परिस्थिती पाहून मृद्निदानानुसार सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि युरिया यांचा अल्प प्रमाणात वापर करावा.
कीड नियंत्रण : उघडीप पावसामुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे वेळोवेळी शेतात फेरफटका मारून कीडनाशकांची फवारणी करावी.
मूग-उडीद पिके : अतिवृष्टीमुळे फुलगळती झाल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरीांनी आंतरपीक पद्धती व पर्यायी पीकांची तयारी करावी.
भाजीपाला पिके : भाजीपाल्यावर पाणी साचल्यास त्वरित निचरा करावा आणि जैविक बुरशीनाशकांचा वापर करावा.
प्राण्यांची काळजी : गोठ्याभोवती पाणी साचू न देणे, चाऱ्याचा साठा कोरड्या जागी ठेवणे आणि जनावरांना स्वच्छ पाणी देणे आवश्यक आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे लोकजीवन विस्कळीत झाले आहे. पिकांचे व पशुधनाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे व पिकांसाठी योग्य ती काळजी घेणे हेच सध्या महत्त्वाचे आहे.