पुणे : विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत हा सामना होत असला तरी अपक्ष आणि इतर आघाड्याही डाव बिघडवू शकतात. त्यात पुण्यातील हायहोल्टेज लढत कसब्यात होत आहे. कधीकाळी भाजपला बालेकिल्ला असणारा कसब्याचा गड पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी भेदला होता. पण आता समीकरणे बदलली असून हे आव्हान ते पेलणार का? की भाजपचे हेमंत रासने बाजी मारणार? याबाबत लोकल18 ने ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग काळभोर यांच्याशी बातचित केलीये.
advertisement
रवींद्र धंगेकरांना संधी
यंदाची कसबापेठ विधानसभेची पोट निवडणूक ही अत्यंत चूरशीची होईल असा अंदाज आहे. कसबा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला असला तरी गेली अनेक वर्ष रवींद्र धंगेकर तिथे नगरसेवक म्हणून काम करत आहेत. यापूर्वी दोन विधानसभेच्या निवडणुका देखील लढवल्या होत्या आणि त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे त्यांना कुठे तरी काम करण्याची संधी मिळावी अशी लोकभावना होती. त्यामुळे त्यांना पोटनिवडणुकीत संधी मिळाली. त्यानंतर देखील त्यांनी लोकांचे प्रश्न मांडले. त्यांचा दांडगा लोकसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे, असे ज्येष्ठ पत्रकार सांडभोर सांगतात.
'जरांगे पॅटर्न'चा कुणाला फायदा? पाटलांच्या जालन्यातील समीकरण नेमकं काय?
भाजपचा बालेकिल्ला, रासनेंना फायदा
कसबा पेठ मतदार संघात गिरीश बापट यांनी अनेक वर्ष विधानसभेची निवडणूक लढली आणि जिंकली सुद्धा. पोटनिवडणुकीत काही समीकरणांमुळे भाजप उमेदवाराच पराभव झाला. परंतु, आता स्थिती बदलू शकते. गेल्या दीड वर्षांत भाजप उमेदवार हेमंत रासने मतदारसंघात सक्रीय राहीले आहेत. तसेच आता राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार गटही सोबत असणार आहे. त्यातच भाजपमध्ये कोणतीही बंडखोरी झालेली नाही. त्याचा फायदा रासनेंना होऊ शकतो.
भाजपकडून ब्राह्मण समाजाचं समाधान
मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर ब्राह्मण समाजाला प्रतिनिधित्व मिळालं नव्हतं. त्यामुळे समाजात नाराजी होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर पोटनिवडणूक झाली होती. परंतु आताची मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली आहे. त्यामुळे ही नाराजी कमी झाली आहे. या मतदारसंघात ब्राह्मण समाजाचा टक्का जास्त आहे. त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो.
राजकारणाचा कोल्हापुरी पॅटर्न! प्रचाराचा पहिला नारळ इथंच का फुटतो? पाहा कारण..
धंगेकरांना आव्हान
विधानसभा निवडणूक धंगेकरांसाठी सोपी नसणार आहे. रवींद्र धंगेकर हे पोटनिवडणुकीत जवळपास 11 हजार मतांनी निवडून आले होते. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत रवींद्र धंगेकर उमेदवार होते. मात्र, कसबा मतदारसंघातून भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना 15 हजार मतांचं मताधिक्य मिळालं होतं. भाजपचं हे मताधिक्य घटवण्याचं आव्हान धंगेकरांपुढं असणार आहे. त्यातच काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली असून ते थोपवणं पक्ष नेतृत्वाला जमलेलं नाही. त्यामुळे धंगेकरांसाठीही ही निवडणूक सोपी नाही, असे सांडभोर सांगतात.
सामना चुरशीचा होणार
विधनासभा निवडणुकीत दोन्ही बाजूंचा विचार करता कसबा पेठ मतदारसंघात चुरशीचा सामना होणार आहे. सध्याचे आमदार रवींद्र दंगेकर यांना ही निवडणूक सोपी नाही. तसेच ती रासने यांच्यासाठीही आव्हानात्मक असणार आहे. दोन्ही नेत्यांच्या जमेच्या बाजू असल्या तरी इतर समीकरणंही महत्त्वाची ठरणार आहेत. त्यामुळे काँटे की टक्कर होणार असल्याचं ज्येष्ठ पत्रकार सांडभोर सांगतात.





