पुणे : आयुष्यात जर एखादी गोष्ट मिळवायची असेल, त्यासाठी जिद्द असेल आणि मेहनत घ्यायची तयारी असेल, तर त्यासाठी वयाचे बंधन नसते, हीबाब एका वृद्ध महिलेने सिद्ध करुन दाखवली आहे. नुकताच बारावीचा निकाल लागला. यामध्ये मावळमधील चक्क एका महिलेने वयाच्या 58 व्या वर्षी बारावीची परिक्षा दिली आणि त्यात त्यांना यशही मिळाले आहे.
advertisement
कोण आहे ही महिला -
मावळ तालुक्यातील नायगाव येथील राहणार्या बनताबाई पुताजी काजळे-चोपडे असे या महिलेचे नाव आहे. त्यांनी वयाच्या 58 व्या वर्षी बारावीची परिक्षा दिली. त्यात त्या उत्तीर्ण झाल्या आहेत. शिक्षण सोडल्यानंतर तब्बल 42 वर्षांनी त्यांनी बारावीची परिक्षा दिली आणि त्यात यश मिळविले. त्यांच्या या यशाचे मावळ तालुक्यातून कौतुक होत आहे.
शिक्षणाची आवड असेल तर कितीही संकटं, समस्या आले तरी काही जण त्यातून मार्ग काढतात. असाच काहीसा प्रकार मावळ तालुक्यातील नायगाव येथे घडला आहे. अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करणार्या बनताबाई यांनी बारावीची परिक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी सरकारने दिलेल्या मुदतवाढीचा फायदा घेत बारावीसाठी बाहेरून परिक्षा देता यावी यासाठी 17 नंबरचा फॉर्म भरला.
महिलांसाठी पोस्ट ऑफिसची ही योजना म्हणजे एकदम भारी, कमी पैशात मिळणार तब्बल इतकं व्याज
काही शिक्षकांच्या मदतीने आणि चोपडे कुटुंबातील मार्गदर्शनामुळे आजींनी अभ्यासाला सुरूवात केली. घरातील काम आणि त्यानंतर अंगणवाडी सेविका म्हणून काम केल्यानंतर अभ्यास करीत असे. अगदी जिद्दीने अभ्यास करून त्यांनी बारावीची परिक्षा दिली. परिक्षेच्यावेळी वर्गावर येणारे परिक्षकही त्यांची आस्थेने विचारपूस करीत त्यांच्या या निर्णयाचे कौतुक करीत होते. नुकताच बारावी परिक्षेचा निकाल लागला.
या परिक्षेत आजींनी 48 टक्के गुण मिळविले आहेत. ही बातमी सर्वत्र पसरली आणि गावातीलच नव्हे तर मावळ तालुक्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नातेवाईकही फोन करून अथवा प्रत्यक्ष घरी येऊन बनताबाई यांचेे अभिनंदन करीत आहेत. नायगाव ग्रामस्थांच्या वतीनेही बनताबाई यांचे अभिनंदन करण्यात आले. अर्ध्यात शिक्षण सोडणाऱ्या अनेकांसाठी त्यांचा हा प्रवास प्रेरणादायी आहे.