पिंपरी-चिंचवड शहराने स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये देशात सातवा आणि राज्यात पहिला क्रमांक मिळवला. त्यामुळे महानगरपालिका स्वतःची पाठ थोपटत असली, तरी खरे हिरो म्हणजे स्वच्छता व ड्रेनेज कामगार आहेत. कारण ते स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करतात. ड्रेनेज साफ करताना अनेक वेळा मृत्यूच्या घटनाही घडतात. या स्वच्छता कामगारांनी काही मागण्या मांडल्या आहेत, आणि त्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
advertisement
Pune News: पुणे देशात अव्वल! CPCB चा अहवाल समोर, प्लास्टिक व्यवस्थापनात 99 टक्के गुण, कसं मिळालं यश?
स्वच्छता कामगार आशा खंडाळे यांनी सांगितले की, “स्वच्छता कामगारांसाठी उपलब्ध कोठीमध्येही अनेक असुविधा आहेत. कोठीची पत्रे गळतात, त्यामुळे पावसाचे पाणी आत येते, फॅन चालू नाहीत, स्वच्छतागृह खराब झालेले आहेत, पाण्याची सोय नाही, आणि बाहेर कामावर गेल्यावर बाथरूमची सुविधा उपलब्ध नाहीत. अनेक ठिकाणी काम केल्यानंतर हात धुण्यासाठी पाणी सुद्धा नसतं.”
“काही नागरिक ओला आणि सुका कचरा एकत्र देतात, अनेक महिला सॅनिटरी पॅड पॅक न करता टाकतात. अशा अनेक अडचणींचा सामना स्वच्छता कामगारांना दररोज करावा लागतो,” असे खंडाळे सांगतात. दरम्यान, स्वच्छता कर्मचाऱ्यांना अनेक ठिकाणी दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. जो मान-सन्मान मिळायला हवा तो त्यांना कधीच मिळत नाही. नेतेमंडळी किंवा काही हौशी मंडळी ‘स्वच्छ भारत अभियान’ आमच्यामुळे पुढे जात आहे, असं कितीही ओरडून सांगत असले, तरी स्वच्छतेचे खरे हिरो स्वच्छता कामगारच आहेत.