दुबईमध्ये डेहरा सिटी सेंटर परिसरात, विमानतळाजवळ सागर ताकवले यांनी चार महिन्यांपूर्वी ‘चूल मटण’ हे महाराष्ट्रीयन संकल्पनेवर आधारित रेस्टॉरंट सुरू केले आहे. पुण्यातील चवीचा अनुभव दुबईमध्येही मिळावा आणि महाराष्ट्रातून पर्यटनासाठी येणाऱ्या लोकांना घरगुती जेवण मिळावे या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला. मात्र सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे विमान सेवा बंद झाल्याने अनेक भारतीय पर्यटक दुबईत अडकले आहेत.
advertisement
Pune News: मायभूमी युद्धाने होरपळली, पुण्यात इराणी विद्यार्थ्यांसमोर नवं संकट, पोलीसही आले पुढे!
सामान्यतः परदेशात जाणाऱ्या पर्यटकांचे टूर पॅकेज चार ते पाच दिवसांचे असते. परंतु सध्याच्या परिस्थितीत विमान सेवा बंद असल्याने काहींना आठ ते दहा दिवसांपर्यंत दुबईत थांबावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या राहण्याबरोबरच जेवणाच्या खर्चातही वाढ होत आहे. अनेक पर्यटक मर्यादित बजेट घेऊन फिरायला येत असल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही अडचण लक्षात घेऊन सागर ताकवले यांनी आपल्या रेस्टॉरंटमधून भारतीय नागरिकांना मोफत जेवण देण्याचा निर्णय घेतला आहे.
सोशल मीडियावर माहिती देत त्यांनी दुबईतील डेहरा सिटी सेंटर परिसरात अडकलेल्या भारतीयांनी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. सोशल मीडियावर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधणाऱ्या नागरिकांपर्यंत जेवण पोहोचवण्याचीही व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक भारतीयांना दिलासा मिळाला आहे.
सध्याची परिस्थिती किती दिवस राहील याबाबत निश्चितता नाही. मात्र जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करत राहू. माझ्याकडे रेस्टॉरंट आहे, त्यामुळे अडचणीत असलेल्या लोकांना जेवण देऊन त्यांना थोडा आधार देता येतो, अशी माहिती सागर ताकवले यांनी दिली.
दरम्यान, दुबईमध्ये व्यवसाय करणाऱ्या इतर भारतीय हॉटेल व्यावसायिकांनीही एकत्र येऊन अडचणीत सापडलेल्या भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे संकटाच्या काळातही पुणेकरांनी दाखवलेली माणुसकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.





