वन विभागाच्या माहितीनुसार, या भागात विशेषतः ऊसपट्ट्यात बिबट्यांचे अस्तित्व वाढले आहे. उसामध्ये त्यांना सुरक्षित वातावरण, पाण्याचा पुरवठा आणि अन्नस्रोत मिळत असल्याने तेथे राहणे त्यांना सोयीचे झाले आहे. कुत्रे हे त्यांचे प्रमुख शिकार असले तरी, ते उपलब्ध नसल्यास बिबटे उंदीर, घूस यांसारख्या लहान प्राण्यांवरही उपजीविका करतात. मात्र ऊसकापणीचा हंगाम सुरू झाल्याने त्यांचे निवासस्थान उद्ध्वस्त होत असून, त्यामुळे ते मानवी वस्तीकडे वळत आहेत.
advertisement
बिबट्यांच्या चार पिढ्या उसात
जुन्नर, शिरूर आणि आंबेगाव परिसरात बिबट्यांची चार पिढी उसामध्येच वाढल्याचे वन विभागाचे निरीक्षण आहे. वन्यजीव क्षेत्रात बिबट्यांचे जिवंत राहण्याचे प्रमाण तुलनेने कमी असते. उदाहरणार्थ, एखाद्या मादीने तीन पिल्लांना जन्म दिला तरी त्यापैकी एकच जगते. परंतु, ऊसपट्ट्यात मात्र ही परिस्थिती वेगळी आहे. येथे मादीने दिलेली तीनही पिल्ले जिवंत राहतात. त्यामुळे या भागातील बिबट्यांची संख्या सातत्याने वाढत चालली आहे.
सांस्कृतिक पुण्यातले 'बक्कासूर', मिसुरडं न फुटलेली पोरं अन् कोयते! SPECIAL REPORT
बिबट्याचा याच भक्ष्यावर हल्ला
बिबट्या सामान्यतः माणसांवर हल्ला करत नाही, परंतु त्याच्या दृष्टीक्षेपात अचानक काही हालचाल झाल्यास किंवा त्याच्या ‘आय कॉन्टॅक्ट’मध्ये लहान मूल अथवा जनावर आले, तर तो हल्ला करू शकतो. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे. जनावरे बंदिस्त ठिकाणी बांधावीत, रात्रीच्या वेळी लहान मुलांना एकटे सोडू नये, तसेच शेतात जाताना बॅटरी, मोबाइल लाईट वापरणे, काठीला घुंगरू बांधणे किंवा गाणी लावणे यांसारख्या उपाययोजना केल्यास बिबटे घाबरून दूर जातात, असा सल्ला अधिकाऱ्यांनी दिला आहे.
केंद्राकडे पाठवला प्रस्ताव
दरम्यान, जुन्नर भागात वाढत असलेल्या बिबट्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी वन विभागाने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावात बिबट्यांची नसबंदी (स्टेरिलायझेशन) करण्याचा उल्लेख करण्यात आला आहे, जेणेकरून त्यांची संख्या मर्यादित ठेवता येईल. तसेच अलीकडे ट्रॅप केलेल्या बिबट्यांना वन तारा या अभयारण्यात हलवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वन परीक्षेत्र अधिकारी भांबुर्डा मनोज बारबोले यांनी दिली.
नागरिकांना आवाहन
वन विभागाकडून नियमितपणे बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात असून, पिंजरे लावणे, सीसीटीव्ही निरीक्षण वाढवणे आणि स्थानिकांना जनजागृती करणे यावर भर दिला जात आहे. नागरिकांनी अफवा न पसरवता शांतता आणि सावधगिरी बाळगावी, तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
बिबट्यांचा वावर वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे मानवी अतिक्रमण आणि नैसर्गिक अधिवास कमी होणे. यामुळे वन्यजीव आपले अन्नस्रोत आणि निवासस्थान शोधण्यासाठी गावाकडे वळत आहेत. या समस्येवर उपाय म्हणून प्रशासन, वन विभाग आणि स्थानिक नागरिक यांच्यात समन्वयाने प्रयत्न होणे आवश्यक आहे, अशी मागणी केली जात आहे.





